Loksabha election | पुणे काँग्रेसमध्ये नाराजी; धंगेकरांच्या उमेदवारीवरून अंतर्गत प्रतिप्रश्न
पुणे : पुढारी वृत्तसेवा : विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देऊन पक्षाने काय साधले? असा सवाल काँग्रेसचे माजी नगरसवेक आबा बागूल यांनी केला आहे. मला उमेदवारी मिळू नये म्हणून पक्षातील शुक्राचार्यांनी प्रयत्न केले आहेत. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याने कार्यकर्ते नाराज झाले आहेत, असे आबा बागूल म्हणाले. बागूल यांच्या भूमिकेमुळे काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून काँग्रेसने कसबा पेठचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यानंतर इच्छुक असलेले आबा बागूल यांनी शुक्रवारी (दि. 22) पत्रकार परिषद घेऊन आमदार धंगेकर यांना उमेदवारी देण्यावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे, त्या वेळी ते बोलत होते. बागूल म्हणाले, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर निष्ठावंतांना धक्का बसला आहे. त्यांना न्याय मिळेल, ही अपेक्षा आहे. 40 वर्षे काम करणार्यांना
तिकीट दिले नाही. आता आलेले आमदार त्यांना तिकीट देण्यात आले. ते सेना आणि मनसेतून आले आहेत. अपक्ष म्हणूनही निवडून आले. त्यानंतर पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली. त्यांना आम्ही, पक्षाने मेहनत करून निवडून आणले. लोकसभेसाठी बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, उल्हास पवार, मी असे अनेक कार्यकर्ते इच्छुक आहोत. त्यांना उमेदवारी न देता पक्षाने काय निकष लावून
आमदार धंगेकर यांना उमेदवारी दिली?
राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रा काढली. त्यात पक्षातील निष्ठावंतांना न्याय मिळणार आहे का? असा सवाल करीत मला उमेदवारी मिळू नये, यासाठी पक्षातील शुक्राचार्यांनी प्रयत्न केले. त्यांचा शोध घेतला पाहिजे, असे बागूल म्हणाले.
हेही वाचा