शिर्सुफळ : पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यातील शिर्सुफळ गाडीखेल, साबळेवाडीतील 825 हेक्टर वनपरिक्षेत्रात वन विभागाने 20 पाणवठे निर्माण केले. परंतु, त्यातील एकाही पाणवठ्यात पाणी उपलब्ध नसल्याने चिंकारा, कोल्हा, ससे, तरस, लांडगे तहान भागविण्यासाठी नागरी वस्तीकडे धाव घेत आहेत. गाडीखेल, शिर्सुफळ, साबळेवाडीत हरणे पाण्याच्या शोधात येत आहेत. गावामध्ये मोकाट कुत्र्यांच्या वावर मोठ्या संख्येने असल्याने हरणांवर हल्ला होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे वन विभाग व स्थानिक प्रशासनाने वनक्षेत्रातील पाण्याबाबत उपाययोजना करण्याची गरज आहे.
बारामती तालुक्यात यंदा अत्यल्प पाऊस झाला. त्याचा फटका वन्यजीवांनाही बसला आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच पाणवठे कोरडे पडले. त्यामुळे पशू-पक्षी तहान भागविण्यासाठी मानवी वस्तीत येत आहेत. यावर उपाय म्हणून पाणवठे भरणे गरजेचे आहे. शिर्सुफळ, गाडीखेल वनक्षेत्रातील नाल्यांचे पाणी आगामी काळात अडविल्यास वन्यप्राणी, पक्षी आणि गुरांना पिण्याचे पाणी उपलब्ध होईल. यामुळे भूजलपातळीत वाढ होईल, असे ग्रामस्थांनी सांगितले.
शिसुर्फळ वनक्षेत्रात जवळपास 20 पाणवठे आहेत. त्यातून पाण्याची गळती होत असल्याने जादा दिवस पाणी टिकत नाही. लवकरच नवीन पाणवठे बांधणार आहोत.
– अनिल माने, वनरक्षक
हेही वाचा