नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : ज्या स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधिस्थळाचा विकास होतो आहे, त्यांचा फोटो कुठल्याही फ्लेक्सवर, जाहिरातींवर नसावा, हा तमाम शंभूभक्तांचा, त्यांच्या भावनांचा अपमान आहे, अशा शब्दांत खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याचा राजकीय इव्हेंट केल्याबद्दल टीका केली. ते नारायणगाव येथे रविवारी (दि. 3) पत्रकारांशी बोलत होते. पत्रकारांशी बोलताना खा. डॉ. कोल्हे म्हणाले की, 334 वर्षे ही समाधी, हे स्मारक या ठिकाणी असल्याची आठवण करून देताना काही लोक 15 वर्षे या भागाचे खासदार होते. स्वतः अजित पवार हे साडेतेरा वर्षे पालकमंत्री होते. त्या वेळी या स्मारकाचे काम का झाले नाही? असा प्रश्न खासदार डॉ. कोल्हे यांनी उपस्थित केला.
खा. कोल्हे म्हणाले की, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा ज्वलंत तेजस्वी इतिहास 157 देशांत पोहचविण्यात खारीचा वाटा उचलू शकलो, ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. त्यामुळेच 2019 नंतर मी आणि आमदार अशोक पवार यांनी सातत्याने या समाधिस्थळाचा विकास व्हावा, यासाठी मागणी व पाठपुरावा सुरू केला. त्यानंतर आता निवडणुकीच्या तोंडावर का होईना हे भूमिपूजन होत आहे, यासाठी मी आभारी आहे. दुसरं म्हणजे, कोनशिलेवर नाव नसले तरी काळजावर कुणाचे नाव कोरलेय, हे जनता जाणते, अशी टीका कोनशिलेवरील नाव वगळण्याच्या प्रकाराबदल खा. डॉ. कोल्हे यांनी केली.
हेही वाचा