भिवंडीत 16 लाखांचा 37 किलो गांजा जप्त | पुढारी

भिवंडीत 16 लाखांचा 37 किलो गांजा जप्त

भिवंडी : पुढारी वृत्तसेवा : भिवंडी शहरात गुरुवारी शांतीनगर पोलिसांनी दहा किलो गांजा पकडल्याची घटना ताजी असतानाच अंजुरफाटा खारबाव रस्त्यावर गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत दोघा जणांना ताब्यात घेत त्यांच्या जवळून 16 लाखांचा 37 किलो गांजा जप्त करण्याची कारवाई केली आहे.

संबंधित बतम्या 

भिवंडी गुन्हे शाखेतील पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून परराज्यातून दोन व्यक्ती गांजा विक्री साठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेने अंजुरफाटा वसई रस्त्या वरील कालवार येथील गुंजन ढाबा येथे सापळा रचला असता दोघे संशयित त्याठिकाणी आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्या जवळ 16 लाख 68 हजार 504 रुपये किमतीचा 37 किलो 394 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला.

पोलिसांनी गांजा बाळगणारे राजकिशोर धूतकृष्णा बेहरा, वय 31 व सागर सुरेंद्र नायक, वय 29 दोघे मुळ राहणार ओडिसा यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघा आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास भिवंडी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रिराज माळी हे करीत आहेत.

Back to top button