पाणीटंचाईचे सावट गडद : खडकवासला साखळी प्रकल्पांत नीचांकी जलसाठा | पुढारी

पाणीटंचाईचे सावट गडद : खडकवासला साखळी प्रकल्पांत नीचांकी जलसाठा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे शहरास पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात गेल्या पाच वर्षांतील सर्वांत नीचांकी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून शहराला पाणीपुरवठा केला जातो. सध्या या चारही धरणांत मिळून एकूण 15.99 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या पाच वर्षांतील हा नीचांकी पाणीसाठा आहे. उन्हाळ्यात पाण्याची मागणी आणखी वाढणार आहे. त्याचबरोबर पाणीचोरी, गळती आणि बाष्पीभवन, यामुळे धरणांमधील पाणीसाठा कमी होणार आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघाचे मतदान पार पडल्यानंतर शहरात पाणीकपात होणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात येत आहे. गेल्या वर्षी कडक उन्हाळ्यामुळे धरणांमधील पाणीसाठा घटला होता. परिणामी, शहरात आठवड्यातून एकदा पाणीकपात करण्याची वेळ महापालिकेवर आली होती. गेल्या वर्षी मोसमी पाऊस विलंबाने सुरू झाला. पूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या दुसर्‍या आठवड्यात चांगला पाऊस बरसला. त्यामुळे खडकवासला धरण 25 जुलै 2023 रोजी 100 टक्के भरले आणि या धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. त्यानंतर पुन्हा ऑगस्ट महिन्यात दमदार पाऊस झाला नाही. सप्टेंबरमध्येही समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे गेल्या वर्षी पावसाने सरासरी देखील गाठली नाही. परिणामी, यंदा उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, 2022 मध्ये धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला. त्यामुळे 2023 मध्ये धरणांमध्ये चांगला पाणीसाठा होता. 2020 आणि 2021 मध्येही चांगला पाऊस झाल्याने 2021 आणि 2022 मध्ये धरणांमध्ये उन्हाळ्यापूर्वी पुरेसा पाणीसाठा शिल्लक होता. 2018 मध्ये यंदाप्रमाणेच कमी पाऊस झाला होता. त्यामुळे 2019 मध्ये यंदापेक्षाही बिकट परिस्थिती होती. यंदा जून महिन्यात मोसमी पाऊस सक्रिय होऊन न बरसल्यास बिकट परिस्थिती होणार आहे. त्यामुळे पुणेकरांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले.

हेही वाचा

Back to top button