कांदा दरात दुपटीने वाढ! निर्यातबंदी उठविल्याचा सकारात्मक परिणाम | पुढारी

कांदा दरात दुपटीने वाढ! निर्यातबंदी उठविल्याचा सकारात्मक परिणाम

राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी उठविल्यानंतर शेतातील कांदे बाजारात नेण्यासाठी खेड तालुक्यातील उत्पादक शेतकर्‍यांची लगबग सुरू झाली आहे. दरम्यान, निर्यातबंदी असताना कांद्याला 10 ते 12 रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळत होता. त्यात वाढ होऊन हा भाव 20 ते 22 रुपयांपर्यंत मिळत असल्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.
खेड तालुक्यात रब्बी हंगामात शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा पीक घेतात.

तालुक्यात भीमा-भामा नदी तसेच बंधारे आणि चास-कमान धरणाच्या डावा कालव्याच्या पाण्यावर आधारित बागायती क्षेत्र वाढले आहे. तालुक्यात जवळपास दहा हजार हेक्टरवर कांद्याची लागवड केली जाते. गेला महिनाभर कांद्याची काढणी झाली. मात्र, बाजारभाव कमी असल्याने शेतकर्‍यांनी काढणी झालेला कांदा शेतात अरणी करून साठवला होता.केंद्र सरकारने शनिवारी (दि. 17) निर्यातबंदी उठवली. त्यानंतर पहिल्याच दिवशी म्हणजे रविवारी (दि. 18) चाकण, मंचर बाजार समितीच्या आवारात कांद्याला दुप्पट भाव मिळाला.

बाजाराचा अंदाज आल्याने सोमवारी शेतकर्‍यांनी मजूर घेऊन कांदा निवड करून पिशव्या भरल्या. ट्रॅक्टर, पिकअप, ट्रक आदीच्या माध्यमातून हा कांदा बाजारात नेण्यासाठी लगबग सुरू केली. अनेक शेतकर्‍यांना मजूरटंचाईचा सामना करावा लागला. पुढचे काही दिवस बाजारभाव वाढण्याची शक्यता असल्याने काही शेतकरी अद्यापही दरवाढीच्या प्रतीक्षेत आहेत.

शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण

लागवडीनंतर ढगाळ वातावरण, धुक्यामुळे कांद्यावर अनेकदा करप्याचा प्रादुर्भाव झाला. औषध फवारणी करावी लागली. मात्र, तरीही उत्पन्नात अर्धाअधिक फरक पडला. हातात आलेला कांदा आणि पडलेला बाजारभाव, यामुळे शेतकरी हतबल झाला होता. निर्यातबंदी उठल्याने शेतकर्‍यांच्या कष्टाचे चीज होईल, असे तुकईवाडी, भांबुरवाडी तसेच पानमळा (सांडभोरवाडी) येथील रोहिदास दरेकर, करण सांडभोर, एकनाथ वरकड, कुंडलिक थिगळे, पिंटू ऊर्फ प्रदीप वाळुंज या शेतकर्‍यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button