मुंबईत सरकारकडून त्रास झाल्यास रस्त्या-रस्त्यावर मराठा दिसला पाहिजे

मुंबईत सरकारकडून त्रास झाल्यास रस्त्या-रस्त्यावर मराठा दिसला पाहिजे

शिक्रापूर : पुढारी वृत्तसेवा :  युद्ध लढावं मराठ्यांनी व जिंकाव मराठ्यांनीच, अशी चेतना उपस्थित सकल मराठा समाजामध्ये चेतवत मुंबईमध्ये सरकारने त्रास दिल्यास महाराष्ट्राच्या रस्त्या-रस्त्यावर मराठा दिसला पाहिजे, असे आवाहन करतानाच मनोज जरांगे यांनी, मराठा समाजासाठी ओबीसीतूनच आरक्षण घेणारच या मागणीचा पुनरुच्चार केला. निर्धारित वेळेपेक्षा तब्बल साडेसात तास उशिराने मंगळवारी (दि.23) पहाटे अडीचच्या सुमारास कारेगाव-रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे मनोज जरांगे यांची सभा झाली. कडाक्याच्या थंडीत देखील मोठा जनसमुदाय त्यांचे विचार ऐकण्यासाठी उपस्थित राहिला होता. शिरूर तालुक्यात जरांगे यांचे आगमन झाल्यानंतर हजारोंच्या संख्येने लोक रस्त्याच्या कडेने गावागावामध्ये उभे होते.

संबंधित बातम्या :

जरांगे म्हणाले, की आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे. आरक्षण आपण आता घेतल्यात जमा आहे. या दृष्टीने सकल
मराठी समाजाने मुंबईकडे कूच केली आहे. आरक्षण घेतल्याशिवाय परतणार नाही. प्रत्येक वेळी सरकारने समाजाची फसवणूक केली आहे. पहिल्यांदाच मराठ्यांमध्ये एकजूट झाली आहे, यातही फूट पाडण्याचा प्रयत्न आहे. यासाठी काही जण देव पाण्यात बुडवून बसले आहेत. अशीच एकी पुढे राहिली तर जगामध्ये मराठा समाज प्रगत म्हणून पुढे येईल. शिक्षण व नोकरीमध्ये आपला टक्का वाढला पाहिजे. देव आडवा आला तरी ओबीसीतून आरक्षण घेणारच.

अनेक राजकीय पक्षांचे नेते आपण मोठे केले आणि एकही नेता आरक्षणाच्या बाजूने बोलायला तयार नाही. अधिवेशनात स्वार्थासाठी राजकीय नेते बोलले. आरक्षणाच्या आड नेते आले तर त्यांचा राजकीय सुपडासाफ करू. राजकारण न कळण्याइतके आता मराठा दूधखुळे पुढे राहिलेले नाहीत. यांची मुले परदेशात शिकणार व आमची मुले काय ऊसतोडीला जाणार का? मी 'मॅनेज' होत नाही हीच सरकारपुढे खरी डोकेदुखी आहे. मंत्र्यांच्या तब्बल 27-28 बैठका झाल्या, परंतु एकदा आलेला मंत्री परत पुन्हा येतच नाही, असेही जरांगे म्हणाले.

54 लाख नोंदींची कुणबी प्रमाणपत्रे वितरित करण्याची सरकारला मागणी केली आहे. एका नोंदीवर किमान पाच प्रमाणपत्रे मिळाली तर तब्बल अडीच कोटी मराठा आरक्षणात आल्यात जमा आहेत. या सर्वांच्या सगे-सोयर्‍यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, असा वटहुकूम अथवा अध्यादेश काढा, अशी सरकारकडे मागणी आहे. मी असो किंवा नसो, विचार जिवंत ठेवा व एकी ठेवा, असेही आवाहन जरांगे यांनी केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news