Ajit Pawar : मुंबईत या, फाईलवर कोणाची सही आहे, ते दाखवतो : अजित पवार 

उपमुख्यमंत्री अजित पवार. संग्रहित छायाचित्र
उपमुख्यमंत्री अजित पवार. संग्रहित छायाचित्र
बारामती : पुढारी वृत्तसेवा :  बारामती तालुक्यातील जनाई-शिरसाई योजनेवरून राष्ट्रवादीच्याच दोन गटात सध्या श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. माझ्या सहीने ही योजना मार्गी लागल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले होते, यासंबंधी रविवारी (दि. २१) उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारणा केली असता त्यांनी मुंबईला मंत्रालयात या, कोणाच्या सहीने ही योजना झाली ते दाखवतो असे सांगितले. मला वरिष्ठांबद्दल टीकाटीप्पणी करायची नाही, पण जिल्ह्याचा पालकमंत्री आणि कालवा नियोजन समितीचा अध्यक्ष या नात्याने माझ्याकडूनच हे काम मार्गी लागणार असे पवार म्हणाले. Ajit Pawar
जनाई-शिरसाई योजनेवरून बारामतीत राष्ट्रवादीचे दोन गट आमनेसामने ठाकल्याचे चित्र सध्या दिसते आहे. सुपे परिसरातील काही गावांतील शेतकरी पुण्यातील सिंचन भवन येथे योजनेच्या अनियमित पाणी वापराच्या तक्रारीसाठी गेले होते. परंतु अधिकाऱ्यांनी तेथे ऐकूनच न घेतल्याचा आरोप त्यांनी केला होता. शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर खासदार सुप्रिया सुळे यांनी सुपे परिसरात दौरा करत चर्चा केली. शरद पवार यांनी गोविंदबागेत येण्याचे शेतकऱ्यांना निमंत्रण दिले. शेतकऱ्यांनी यावेळी योजनेच्या तक्रारींचा पाढा वाचला. पवार यांनी जलसंपदा खाते असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला. Ajit Pawar
यासंबंधीची बैठक २३ जानेवारी रोजी निश्चित केली. ही बैठक ठरल्याचे कळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (दि. २०) टंचाई निवारण आढावा बैठक सुप्यात घेतली. शिवाय आपल्या हाताचा अंगठा पुढे करत याच हाताने हे काम होणार आहे, इतर कोणीही ते करू शकणार नाही. राज्यातील २८८ मतदार संघातील आमदारांपैकी फक्त मीच हे काम करू शकतो असे ठामपणे सांगितले. त्यातून श्रेयवाद सुरु झाला आहे. यासंबंधी
रविवारी पवार यांना विचारणा केली असता ते म्हणाले, मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. कालवा सल्लागार समितीचा अध्यक्ष आहे. जिल्ह्यातील पाण्याचे नियोजन त्या-त्या भागातील लोकप्रतिनिधींना, जलसंपदाच्या अधिकाऱ्यांना बरोबर घेवून मी करत असतो. त्यानुसार आम्ही नियोजन केलेले आहे. आता फेब्रुवारीत बैठक घेत उन्हाळी नियोजन करणार आहे. मोठ्या लोकसंख्येच्या शहरांतील नागरिकांना पिण्याचे आणि शेतकऱ्यांना पाणी देणे आवश्यक आहे. सध्याची पाण्याची परिस्थिती बघता काटकसरीने वापर केला तर उन्हाळा ठिक जायला मदत होईल असे पवार म्हणाले.

Ajit Pawar : सुळेंच्या वक्तव्यावर नो काॅमेंटस

खासदार सुप्रिया सुळे यांनी पाण्याचे नियोजन करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला होता. सरकारने तात्काळ बैठक घेत पाण्याचे नियोजन करावे अशी मागणी केली होती. यासंबंधी पवार यांना विचारणा केली असता त्यांनी नो काॅमेंटस म्हणत प्रश्न टाळला.

  कृषिक प्रदर्शनाला मदत

अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषिक प्रदर्शनाकडे फिरकले नसल्याच्या मुद्द्यावर पवार यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, कृषिकच्या उदघाटनाला दरवर्षी केंद्र व राज्यातील प्रमुखांना, राजकीय व्यक्तिंना बोलावले जाते. ते शुक्रवार ते रविवारच्या दरम्यानच्या तारखा देतात. यंदा उदघाटनाची १७ तारीख होती. त्या दिवशी मुंबईमध्ये महत्त्वाच्या बैठका होत्या. त्यामुळे जमले नाही. दुसरे काही कारण नाही. शेवटी अशी प्रदर्शने झाली पाहिजेत. त्यातून शेतकऱ्यांना अनेक गोष्टी समजतात. दरवर्षीची प्रदर्शनाची परपंरा असून मी त्याला आजवर सहकार्यच करत आलो आहे.

हेही वाचा

 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news