पुरातत्त्व खात्याच्या या प्रकल्पामुळे शेकडो वर्षांच्या काळाच्या लुप्त झालेला छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांचा ज्वलंत वारसा इतिहास ऐतिहासिक साहित्य वस्तू, साधने, वास्तू, स्थळांच्या माध्यमातून जगासमोर येणार आहे. गेल्या वर्षी पुरातत्व खात्याने राजगडाच्या पायथ्याला शिवपट्टण परिसरात उत्खनन केले होते. त्या वेळी उत्खननात छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांच्या भव्य राजवाड्यासह विविध बांधकामे, वास्तूंचे अवशेष, शिवकालीन नाणी व इतर साहित्य सापडले होते. छत्रपती श्रीशिवरायांचा वारसा जतन करण्यासाठी पुरातत्व खात्याने वेगाने कार्यवाही सुरू केली. त्यानुसार शिवरायांचा राजवाडा, विविध वास्तू, संग्रहालय आदी वास्तूंची उभारणी करण्यासाठी तज्ज्ञ वास्तुविशारदाची नियुक्ती करण्यात आली होती. त्याचा आराखडा पुरातत्त्व खात्याने शासनाला सादर केला होता. त्यास शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. छत्रपती श्रीशिवरायांच्या 350 राज्याभिषेक वर्षानिमित्त शिवरायांचा ज्वलंत वारसा जोपासण्यासाठी शासनाने भरघोस निधी दिला आहे.