दौंड : पुढारी वृत्तसेवा : दौंड-पुणे लोहमार्गावर मंगळवारी (दि. 5) पुणे – नांदेड गाडी सिग्नल नसल्याने दौंड आऊटरला थांबली असता पाच ते सहा चोरट्यांनी प्रवाशांना मारहाण करत सोने, मोबाईल व रोख रक्कम असा एक लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल पळवून नेला. दरम्यान रेल्वे निघाल्यानंतर या चोरट्यांनी रेल्वेवर दगडफेक देखील केली. रेल्वेचे साहाय्यक पोलिस निरीक्षक बाळासाहेब अंतरकर यांनी ही माहिती दिली याप्रकरणी प्रवासी व्ही.शकुंतला (वय 65, रा. यमुनानगर, पच्छा संक्रा अपार्टमेंट, कोईमतुर, तामिळनाडू), संगीता महादेव कायंदे (वय 43, रा. बोरगाव, जि. जालना), फकीर मोहम्मद अब्दुल सुदाम बागवान (वय 55), सिमरन अनिल गोविंदे (वय 22, रा. लेबर कॉलनी, फायर स्टेशन रोड, नांदेड), राहुल दिगंबर जाधव (वय 31, रा. अंबड रोड, जालना) यांनी तक्रार दिली आहे.
दौंड रेल्वे पोलिसांनी याबाबतची माहिती मिळताच त्यांनी शोध मोहीम राबवली. त्यांना तीन ते चार जण पळून जाताना दिसले. त्यांचा पाठलाग केला असता ते उसाच्या शेतातून पळून गेले. दुसर्या दिवशी रेल्वे पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले. श्वान पथकाने ज्या भागातून चोरटे पळाले होते तेथेपर्यंत मार्ग काढला. उसाचे क्षेत्र असल्याने श्वान काय पुढे गेले नाही. यापूर्वीदेखील दौंड आऊटरला अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. तरीसुद्धा रेल्वे प्रशासनाने सुरक्षेबाबत उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे.
हेही वाचा :