बीआरटी हटवल्याने प्रवाशांचे हाल; वाहतूक कोंडीमुळे पीएमपी बस प्रवास संथ | पुढारी

बीआरटी हटवल्याने प्रवाशांचे हाल; वाहतूक कोंडीमुळे पीएमपी बस प्रवास संथ

ज्ञानेश्वर बिजले

पुणे : सुमारे एक लाख प्रवाशांची बसमधून रोज वाहतूक होत असताना, पुणे महापालिकेने नगर रस्त्यावरील लाखो रुपये खर्चून बांधलेला बीआरटी मार्ग बुधवारी मध्यरात्री उखडून टाकला. बीआरटीची लेन उपलब्ध होणार असल्याने सध्या अन्य वाहनांना रस्ता थोडा मोकळा होईल. मात्र, बसप्रवासाला उशीर होण्याच्या कारणाने त्यातील काही प्रवासी त्यांच्या वाहनांवरून रस्त्यावर आल्यास थोड्याच दिवसांंत या रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत होण्याऐवजी तेथे आणखी कोंडी होण्याची शक्यता आहे.
या रस्त्यावर मेट्रो सुरू होणार असल्याने, त्याचे खांब बीआरटी मार्गात आले. त्यामुळे, सुमारे चार वर्षे बीआरटी मार्ग बंद झाला होता. ते अडथळे दूर करण्यात आले आहेत. त्यामुळे, तेथील वाहतूक सुरळीत होईल, असे महापालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले. त्यासाठी त्यांनी गोखले इन्स्टिट्यूट यांच्याकडून अहवाल घेतला.  पुण्यातील सार्वजनिक वाहतूक समस्येची गांभीर्याने दखल घेत केंद्र सरकारने 2006 मध्ये  बीआरटी बससेवा प्रकल्प मंजूर करीत पुणे महापालिकेला एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी दिला. त्यातून शहरात अनेक महत्त्वाच्या रस्त्यांचे रुंदीकरण व काँक्रिटीकरण झाले.
मात्र, अन्य वाहनांना जागा कमी पडते, या मुद्द्यावरून बीआरटीचा स्वतंत्र मार्गच काढून टाकण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. स्वमालकीचे वाहने चालविणारे वाहनचालक आणि त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले राजकीय नेते यामुळे बीआरटी योजनात पुण्यात सुरू होऊ शकली नाही.  117 किलोमीटर मार्गावर जलद बससेवा सुरू करण्याचे नियोजन महापालिकेने मान्य केले असताना, प्रशासन पंधरा वर्षांत तीन मार्गांवर जेमतेम वीस किलोमीटर अंतरच बीआरटी बससेवा सुरू करू शकले. त्यातीलही बीआरटीमधील नगर रस्त्यावरील निम्मा स्वतंत्र मार्ग काढून टाकण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे.
नगर रस्त्यावर साडेसात किलोमीटर लांबीच्या बीआरटी मार्गावर तेरा बसथांबे आहेत. तेथील बीआरटी 2015 मध्ये सुरू झाल्यानंतर चार वर्षांतच तेथील प्रवासी संख्या दुप्पट झाली. प्रतीतासाचा साडेचार हजार प्रवासी बीआरटी मार्गातून वेगाने मार्गस्थ होत होते. त्यासाठी लाखो रुपये खर्चून महापालिकेने बसथांबे आणि मार्ग बनविला. मेट्रोचे त्या मार्गावर काम सुरू झाल्यानंतर मात्र तेथील बीआरटी बंद पडली. बीआरटी मार्गावरच मेट्रोचे खांब आले. तसेच रस्त्याच्या कडेला मेट्रो स्थानकाचे जिने बांधल्याने रस्ता अरुंद झाला. बीआरटी मार्गातून काही ठिकाणी गाडी जाण्याऐवढी जागा उरली नाही. त्यामुळे, बीआरटी मार्गासाठी स्वतंत्र लेन ठेवण्याला लोकांचा विरोध होऊ लागला. त्याचा परिणाम झाला. राजकीय नेतेही त्याची मागणी करू लागले. त्यामुळे पर्णकुटी ते रामवाडी यादरम्यानची सुमारे सव्वातीन किलोमीटर अंतरावरील बीआरटी मार्ग काढण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्याची अंमलबजावणी बुधवारी मध्यरात्री करण्यात आली.
नगर रस्त्यावरील बीआरटी मार्गाला आम्ही प्रथमपासूनच विरोध करीत होतो. या मार्गावरील अपघातात अनेकजणांना जीव गमवावा लागला. बीआरटी बससेवेला आमचा विरोध नाही. ती रस्त्याच्या कडेने सुरू ठेवावी.
– कनीज सुखराणी, सामाजिक कार्यकर्त्या.
 मेट्रोच्या कामामुळे बीआरटी विस्कळीत झाली. महापालिकेने व वाहतूक पोलिसांनी दुर्लक्ष केले आणि त्याचे खापर बीआरटीवर फोडण्यात आले. नगर रस्त्यावरून शिरूरच्या दिशेने बीआरटी मार्गातून प्रवासी जलद गतीने प्रवास करतात. रोज एक लाख प्रवासी पीएमपी बसमधून या मार्गावरून जात असल्याने, त्यांची आता गैरसोय होणार आहे. याचा फटका या भागातील रहिवाशांना बसणार आहे. त्यामुळे बीआरटी बससेवा सुरू ठेवावी, अशी आमची मागणी आहे.
– डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर.
 नगर रस्त्यावरील पर्णकुटी ते विमाननगर यादरम्यान बीआरटी मार्ग ठिकठिकाणी आधीपासूनच विस्कळीत स्वरूपात होता. मेट्रोचे खांब उभारल्यानंतर अनेक ठिकाणी बीआरटी मार्गातून बसगाडी जाऊ शकत नव्हती. येथे अनेक अपघात झाले, त्यामुळे तो स्वतंत्र मार्ग हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. सव्वातीन किलोमीटर अंतरापैकी दोन किलोमीटरवर बीआरटी नव्हती. उर्वरित सव्वा ते दीड किलोमीटर अंतरातील रस्त्यावरील अडथळे दूर केले. रामवाडीपासून पुढील मार्गावर बीआरटी सुरू राहील.
– विकास ढाकणे, अतिरिक्त महापालिका आयुक्त, पुणे
हेही वाचा

Back to top button