सर्वपक्षीय मराठा नेत्यांनी एकत्र यावे : चंद्रशेखर बावनकुळे | पुढारी

सर्वपक्षीय मराठा नेत्यांनी एकत्र यावे : चंद्रशेखर बावनकुळे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत बैठक घ्यावी आणि मराठा समाजाचा जास्तीत जास्त फायदा कशात आहे, ते पदरात पाडून घ्यावे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची राज्याच्या दोन्ही सभागृहांसह सर्व नागरिकांची इच्छा आहे. मात्र, एका समाजाचे काढून दुसर्‍या समाजाला देण्याची राज्याची संस्कृती नाही, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. भुजबळ आणि  जरांगे यांच्या वादात पडायचे नसल्याचेही ते म्हणाले.
पुणे शहर भाजपच्या वतीने शहराध्यक्ष चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी बावनकुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईकनिंबाळकर, शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची स्पष्ट भूमिका घेतली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह राज्यातील सर्वच पक्षांच्या नेत्यांनी एकमताने कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेतली आहे.

महायुतीचे 225 आमदार दिसतील

बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा विद्यमान खासदार आहे. त्यामुळे अजित पवार यांनी बारामतीवर दावा सांगणे गैर नाही. ज्या जागा अजित पवार व एकनाथ शिंदे यांना सुटणार आहेत. त्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार निवडूण आणण्यासाठी भाजप पूर्ण ताकत लावेल. तसेच भाजपला सुटणार्‍या जागांसाठी सर्व 11 घटक पक्षांची मदत घेईल. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे 225 आमदार विधानसभेत दिसतील. भाजपने आजवर कधीही युती तोडलेली नाही, युतीत धोका दिला नाही, दरवेळी युतीचा धर्म पाळला आहे.आम्ही त्यांना दिलेला शब्द पाळल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.

बावनकुळे उवाच…

  • विरोधकांकडे कोणतेच मुद्दे नाहीत, त्यामुळे ते बॅनरबाजी करत आहेत.
  • जे विषय सभागृहात मांडले पाहिजे ते बाहेर मांडून उपयोग नाही.
  • महाराष्ट्राच्या विकासाचे जे प्रश्न विरोधक मांडतील ते सोडवण्याची सत्ताधार्‍यांची भूमिका.
  • आमदार रोहित पवारांना मोठा नेता होण्याची घाई झालेली दिसते.
  • दिशा सालियन प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी ज्यांनी केली आहे, त्यांनी काही पुरावे दिले असतील म्हणूनच सरकारने एसआयटी चैकशी करण्याचा निर्णय घेतला असेल.
  • बाळासाहेब ठाकरे हे एका विचाराने पक्ष चालवत होते. ते असते तर युती तुटली नसती.

हेही वाचा

Back to top button