प्रशासनाचा जाच अन् आंदोलनाचा परिणाम ; करंदीतील कंपनी गुजरातला जाणार ! | पुढारी

प्रशासनाचा जाच अन् आंदोलनाचा परिणाम ; करंदीतील कंपनी गुजरातला जाणार !

शिक्रापूर : पुढारी वृत्तसेवा : करंदी (ता. शिरूर) गावातील 180 कोटी रुपये टर्नओव्हर असणारी संकल्प इंजिनिअरिंग ही कंपनी गुजरातच्या राजकोटला स्थलांतरित होण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्र प्रशासनाचा जाच व स्थानिक आंदोलनाला कंटाळून ही कंपनी गुजरात येथे स्थलांतरित होण्याचा विचार करीत आहे. यामुळे सुमारे एक हजाराहून अधिक कामगार बेरोजगार होण्याची शक्यता असून, यामध्ये स्थानिक कामगारांची मोठी संख्या आहे. याबाबत कंपनीच्या एका अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, पूर्ण उत्पादन निर्यात करणारा हा कारखाना असून, सन 2008 मध्ये खासगी जागेवर सुरू झाला होता. या वेळी महसूल विभागाच्या परवानगीने 100 मीटर अंतराचा रस्ता कारखान्याने वापरासाठी घेतला होता. पुढे महसूल विभागाची ही जागा वन विभागाकडे हस्तांतरित झाली. आता मात्र वन विभागावर दबाव आणून काही जण हा कारखाना बंद करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

संबंधित बातम्या :

वन विभागाने सन 2020 मध्ये कारखान्याला नोटीस बजावली आहे. कंपनीला जाण्यासाठी रस्ता मिळावा, यासाठी कंपनीच्या वतीने वन विभागाच्या खात्यांकडे प्रस्ताव दिला आहे. मुंबई येथे मंत्रालयात दहा महिन्यांपासून हा प्रस्ताव पडून आहे. कंपनीचा रस्ता बंद करण्यासाठी काही जण उपोषण आंदोलन करीत आहेत. या त्रासाला कंटाळून कारखाना व्यवस्थापनाने महाराष्ट्रात प्रकल्प नकोच, असे म्हणत गुजरातला पसंती देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सध्या येथे काम करीत असलेल्या कामगारांनाही राजकोट येथील प्रकल्पात सामावून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

पुन्हा राजकीय वाद पेटण्याची शक्यता
महाराष्ट्रात येऊ घातलेला वेदांताचा फॉक्सकॉन प्रकल्प तसेच अनेक प्रकल्प गुजरातला स्थलांतरित झाल्यामुळे महाराष्ट्रात राजकीय वादळ निर्माण झाले होते. त्यानंतर आता हा प्रकल्प गुजरातला स्थलांतरित होण्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा राज्यात राजकीय वाद पेटण्याची दाट शक्यता आहे.

कंपनीत होते कपलिंगची निर्मिती
संकल्प इंजिनिअरिंग या कारखान्यातून कपलिंगची निर्मिती केली जाते. हे कपलिंग समुद्रातून पेट्रोल आणि खणिज तेल काढणाऱ्या कंपन्यांना हे कपलिंग पुरविण्यात येते. याचे उत्पादन सध्या सुरू आहे. मात्र, लवकरच ते बंद पडण्याची शक्यता आहे.

 

Back to top button