Pune Crime News :अनैतिक संबंधातून तरुणाचा खून : तिघांना अटक | पुढारी

Pune Crime News :अनैतिक संबंधातून तरुणाचा खून : तिघांना अटक

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरुणाचे अपहरण करून त्याचा खून केल्याची घटना(पंधारवाडी, ता. इंदापूर) येथे घडली. या प्रकरणी इंदापूर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यांना पाच डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश इंदापूर न्यायालयाने दिला आहे. वैभव शिवाजी पारेकर (वय 26 वर्षे रा. पंधारवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी गणेश लक्ष्मण शिंदे (वय 33), मच्छिंद्र लक्ष्मण शिंदे (वय 30),आकाश सुरेश शिंदे (वय 22, सर्व रा.पंधारवाडी) यांना अटक करण्यात आली आहे.

शिवाजी दामू पारेकर (वय 54 वर्षे, रा.पंधारवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, 28 नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी शिवाजी पारेकर हे पत्नी कांताबाई व मुलगा वैभव यांच्या समवेत जेवण करून बसले असताना वरील तीन ही आरोपी घरी आले. गणेश शिंदे याने घरात येऊन आपल्याला भांडगाव येथे जायचे आहे. तू आमच्या सोबत चल, असे वैभवला सांगितले. वैभवने या तिघांबरोबर भांडगावला चाललो आहोत, असे फिर्यादीला सांगितले.

गणेशने आणलेल्या मोटारीतून वैभव निघून गेला. रात्री उशिरापर्यंत तो आला नाही. त्याची वाट पाहून फिर्यादी आरोपींच्या घरी गेले. तेव्हा ते तिघे देखील रात्रीपासून घरी आले नाहीत, असे त्यांच्या घरच्यांनी सांगितले. 30 नोव्हेंबरपर्यंत वैभवचा तपास लागला नाही. त्यामुळेच गणेशने त्याच्या सहकार्‍यांच्या मदतीने वैभवचे अपहरण करून त्याचा घातपात केला असावा, अशी फिर्यादीची खात्री झाली. त्यांनी आरोपींविरुद्ध इंदापूर पोलिसांत तक्रार दिली. आरोपींना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हा कबूल केला. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक दिलीप पवार करीत आहेत.

निर्जनस्थळी पुरला मृतदेह

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या दिवशी आरोपी वैभवला घेऊन गेले, त्याच दिवशी त्यांनी बाह्यवळण रस्त्यापासून काही अंतरावर बेडशिंगे गावच्या हद्दीत धारदार हत्याराने त्याचा खून केला. त्याचा मृतदेह मोटारीच्या डिकीत रात्रभर ठेवला. घरी आल्यानंतर सकाळी मोटारीतून 70 किलोमीटर अंतरावरील शिंगणापूरच्या दिशेने गेले. शिंगणापूर ते दहिगाव दरम्यान वावरहिरे (ता. माण, जि. सातारा) या गावच्या हद्दीत रस्त्यापासून साधारणतः दोनशे मीटर अंतरावरील माळावर त्यांनी वैभवचा मृतदेह पुरला. तेथून ते परत पंधारवाडीत आले.

हेही वाचा

आळंदीत पोलिसांचा मोठा बंदोबस्त : माउलींचा संजीवन समाधी सोहळा

Pune News : शिरूरला अजित पवार गटाचा उमेदवार कोण?

केळीच्या पानावर जेवणे लाभदायक

Back to top button