खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : खरीप हंगामात पिकांचा विमा काढलेल्या हवेली तालुक्यातील 2 हजार 760 हेक्टर क्षेत्राची पीक विम्याची भरपाई शेतकर्यांना मिळणार आहे. यात बाजरी, भुईमूग व भात पिकांचा समावेश आहे. अपुरा पावसामुळे नुकसान झालेल्या 955 हेक्टर बाजरी पिकांचा विमा शेतकर्यांना देण्यास कंपनीने सुरुवात केली आहे.
विमा कंपनी व शासनाच्या वादात अडकलेल्या भुईमूग पिकांचा विमा नुकसानग्रस्त शेतकर्यांना मिळण्याचा मार्गही मोकळा झाला असून 850 हेक्टर भुईमूग पिकांची भरपाई विमा कंपनी देणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी मारुती साळे यांनी सांगितले. पीकविमा न काढलेल्या शेतकर्यांसह सरसकट शेतकर्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी पुणे जिल्हा सहकार आघाडीचे अध्यक्ष लहु निवंगुणे व शेतकर्यांनी केली आहे. अपुर्या पावसामुळे तालुक्यातील तीस ते चाळीस टक्के क्षेत्रातील खरीप पिके वाया गेली आहेत.
तसेच जमीन नापीक राहिली, याची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी संबंधित विमा कंपनीने शेतकर्यांना भरपाई देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पात्र लाभार्थी शेतकर्यांना भरपाई मिळणार असल्याचे साळे यांनी स्पष्ट केले.तालुक्यात खरिपाच्या लागवडीखाली 7 हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी 2 हजार 760 हेक्टर क्षेत्रातील पिकांचा विमा शेतकर्यांनी काढला आहे. जवळपास 3 हजार 400 शेतकर्यांनी पीकविमा काढला आहे.
हेही वाचा