Latest
कुकडी कालव्यांची दुरवस्था; अस्तरीकरणाअभावी पाणीगळती
नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : कुकडी प्रकल्पातील कालव्यांची दुरवस्था झाली असून अनेक ठिकाणी अस्तरीकरण उखडल्याने पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात होत आहे. यंदा पाऊस कमी असल्याने पाण्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे, परंतु अनेक ठिकाणी पाण्याची गळती होत असल्याने जलसंपदा विभाग याबाबत काय काळजी घेणार, असा प्रश्न विचारला जात आहे. कुकडी प्रकल्पाचे अंतर्गत डिंभा, पिंपळगाव जोगा, माणिकडोह, वडज, चिल्हेवाडी, पाचघर, येडगाव या धरणांचा समावेश होतो. चिल्हेवाडी, पाचघर व पिंपळगाव जोगा या धरणांचे कालवे वगळता इतर धरणांच्या कालव्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे.
संबंधित बातम्या :
25 ते 40 वर्षांपूर्वीचे हे कालवे असल्यामुळे अनेक ठिकाणी त्याचे अस्तरीकरण उखडलेले आहे. सरसकट बहुतांशी सगळ्याच कालव्यांचे अस्तरीकरण करणे गरजेचे आहे. पूर्व भागामध्ये पाणी सोडल्यावर गळती होऊन पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. काही ठिकाणी असलेले जलसेतूही मोठ्या प्रमाणात गळत असून ते कधीही पडतील अशी भीती व्यक्त होत आहे. या सगळ्या धरणांचे कालवे, पोटकालवे पूर्णपणे खराब झालेले आहेत. अनेक ठिकाणी पोटचा र्या गायब झाल्या आहेत. पोटचार्यांची भरपाई घेऊन देखील काही शेतकर्यांनी या पोटचार्या सपाट करून त्या ठिकाणी शेती वाढविली आहे. येडगाव धरणासाठी संपादित केलेल्या काही जमिनीमध्ये उन्हाळ्यात शेतकरी पीक घेतात. वास्तविक ज्या जमिनीची भरपाई घेतली त्या जमिनीमध्ये संबंधित शेतकर्यांनी पिके घेऊन त्याचा आर्थिक लाभ घेणं कितपत योग्य ? याबाबतचे उत्तर मात्र मिळत नाही.
कालव्यांच्या अस्तरीकरणासाठी व दुरुस्तीसाठी शासनाने स्वतंत्र आर्थिक व्यवस्था करणे गरजेचे आहे. येडगाव धरणाच्या कालव्याची लांबी 249 किलोमीटर असून 110 किलोमीटरपर्यंत देखभाल व दुरुस्ती नारायणगावच्या जलसंपदा विभाग कार्यालयाची आहे. व उर्वरित जबाबदारी श्रीगोंदा कार्यालयाची आहे. तसेच इतरही धरणांच्या अनेक कालव्यांची जबाबदारी नारायणगावच्या कार्यालयाची आहे.

