Ajit Pawar : ‘अरे शहाण्या, तू…..’, म्हणत अजितदादांनी रोहित पवारांना फटकारलं! | पुढारी

Ajit Pawar : 'अरे शहाण्या, तू.....', म्हणत अजितदादांनी रोहित पवारांना फटकारलं!

बारामती, पुढारी ऑनलाईन :

कोरोनाकाळात लोकांनी विविध उपयायोजनांची अंमलबजावणी करून स्वतःचे आरोग्य सुरक्षित ठेवण्याचे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) नेहमी करत असतात.

पवार हे काल १३ नोव्हेंबर रोजी बारामती तालुक्यातील धुमाळवाडी येथील रघुनंदन पतसंस्थेच्या उद्घाटनप्रसंगी गेले होते. त्यावेळी त्या ठिकाणी कोणीच मास्क वापरत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी अजित पवार म्हणाले, आमचा रोहितच मास्क वापरत नव्हता. त्यावेळी रोहितला मी म्हटलं, अरे शहाण्या.. तू आमदार आहेस. तू मास्क वापरलास तरच मी इतरांनाही मास्क वापरा म्हणून सांगू शकतो. मी भाषण करतानाही मास्क काढत नाही आणि लोक मात्र मास्क वापरताना दिसत नाहीत. हे बरोबर नाही असं म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

जर यदाकदाचित भविष्यात कोरोनाची तिसरी लाट आली तर, त्याची मोठी किंमत आपल्याला मोजावी लागेल, त्यामुळं टोकाची भूमिका घ्यायला लावू नका असा इशारा यावेळी दिला. लसीकरण लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी उपक्रम राबवावते, लस घेतल्यानंतरही एखाद्याला कोरोना झाला तरी तो माणूस वाचू शकतो. कोरोनामुळं आपल्याला काहीही होत नाही हा गैरसमज मनातून काढून टाकावा असेही ते म्हणाले.

केंद्र सरकार अनेक बॅंकांचं विलीनीकरण करतेय

केंद्र सरकारचा सहकार क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. छोट्या बॅंका मोठ्या बॅंकांमध्ये विलीन करुन, देशात फक्त 6-7 बॅंका ठेवायच्या अशी त्यांची भावना असल्याची टीका पवारांनी केली.

आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर शेतकऱ्यांना पैसे देता येतील

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला होता. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांचं बक्षिस देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटल्यानं त्यांना 50 हजार देता आले नाहीत. आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर ही रक्कम देता येईल, अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली.

जातीय सलोखा कायम राखावा

त्रिपुरातील घटनेनंतर राज्यातील नांदेड, मालेगाव आणि अमरावतीत जातीय दंगली उसळल्या. समाजकंटकांनी त्याचा गैरफायदा घेत गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. मात्र जातीय सलोखा कायम राखावा असे आवाहनही त्यांनी केले.

 

Back to top button