पुणे; पुढारी वृत्तसेवा : आई-वडिलांच्या आधारकार्डवर धाराशिव (उस्मानाबाद) येथील पत्ता असतानाही त्यांच्या नावाचा उल्लेख असलेले शहरी-गरीब योजनेचे कार्ड मिळण्याचा हट्ट धरत एका तरुणाने मंगळवारी आरोग्य विभागात गोंधळ घातला. आरोग्यमंत्र्यांच्या पी. ए. ला फोन करत त्याने महिला आरोग्य अधिकार्यांना अरेरावी केली. यानंतर संबंधितावर पोलिस कारवाई करण्याचा आणि तोवर काम न करण्याचा पवित्रा कर्मचार्यांनी घेतला. पोलिसांना पाचारण केल्यानंतर मात्र त्याने लेखी माफीनामा देत प्रकरण मिटवण्याची विनंती केली.
बिबवेवाडी येथील शिवतेजनगर येथे राहणार्या एका तरुणाकडे महापालिकेचे शहरी-गरीब कार्ड आहे. या कार्डवर आई आणि वडिलांचे नाव घेण्यासाठी त्याने महापालिकेकडे ऑनलाईन अर्ज केला होता. त्यांनी अर्जासोबत जोडलेल्या आई-वडिलांच्या आधारकार्डवर धाराशिव येथील पत्ता होता. ही योजना फक्त पुण्यातील रहिवासी पुरावा असलेल्या नागरिकांसाठीची आहे. त्यांना या योजनेत सहभागी होता येणार नाही, अशी माहिती महापालिकेच्या अधिकार्यांनी सोमवारी दिली. तसेच, आई-वडिलांचा पत्ता बदलण्यासाठी अर्ज केलेली स्लिप आणून दिली, तर कार्ड काढता येईल, असाही पर्याय सांगितला होता.
त्यानंतरही संबंधित तरुण मंगळवारी पुन्हा महापालिकेच्या आरोग्य विभागात आला. त्याने पुन्हा आरोग्य विभागाच्या कर्मचारी आणि अधिकार्यांसोबत वाद घालायला सुरुवात केली. या वेळी त्याने आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या पी.ए.ला देखील फोन लावून तो अधिकार्यांकडे दिला. अधिकार्यांनी पी. ए. ला वस्तुस्थिती सांगितली. त्यानंतर त्याने वरिष्ठ अधिकार्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांचा एकेरी उल्लेख करीत गोंधळ घातला.
या वेळी महापालिकेच्या सुरक्षारक्षकांनी त्याला अडविले. मात्र, त्यांनाही शिवीगाळ केली. त्यानंतर मात्र कर्मचारी व अधिकार्यांनी या तरुणावर पोलिस कारवाई झाल्याशिवाय काम करणार नाही, असा पवित्रा घेतला. अखेर पोलिसांना बोलावून गुन्हा दाखल करायची तयारी सुरू केली. या वेळी त्या तरुणाने एका माहिती अधिकार कार्यकर्त्याला बोलावून घेतले. प्रकरण वाढत जात असल्याचे पाहून दोघांनीही नमती बाजू घेत अधिकार्यांना लेखी माफीनामा दिला.
नागरिकांना शहरी-गरीब योजनेचे कार्ड काढून देण्यासाठी अनेक माननीयांचे कार्यकर्ते रोज आरोग्य विभागात येतात. अनेक वेळा शहराबाहेरील कागदपत्रे जोडून कार्ड काढण्याचा आग्रह हे कार्यकर्ते कर्मचार्यांकडे धरतात. आपण सांगितलेले ऐकले जात नाही, असे दिसताच कार्यकर्त्यांकडून कर्मचार्यांना अरेरावी करत व धमकावत वाद घातले जातात. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने या विभागात काम करण्याची इच्छा होत नसल्याची प्रतिक्रिया महिला कर्मचार्यांनी दिली आहे.
हेही वाचा