

पुणे; पुढारी वृत्तसेवा : नागरिकांचे आरोग्य व जनहित विचारात घेऊन नागरिकांना स्वच्छ, निर्भेळ अन्न प्राप्त होणे आवश्यक आहे. त्यासाठी अन्नपदार्थांत भेसळ करणार्या विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाने कडक कारवाई करावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा अत्राम यांनी दिले आहेत. व्हीव्हीआयपी विश्रामगृह येथे आयोजित अन्न व औषध प्रशासनच्या पुणे विभाग आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी पुणे विभागाचे सहआयुक्त (अन्न) सुरेश अन्नपुरे, सहआयुक्त (औषधे) एस. व्ही. प्रतापराव तसेच पुणे विभागातील अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त उपस्थित होते.
अत्राम म्हणाले, 'सणासुदीच्या दिवसांत नागरिकांचा कल विविध मिठाई पदार्थ खरेदीकडे असतो. अशावेळी नागरिकांना भेसळमुक्त, स्वच्छ पदार्थ कसे मिळतील हे पाहावे. हॉटेलमधील किचनची वेळोवेळी तपासणी करण्यात यावी. कार्यालयात येणार्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करावी. सध्या ऑनलाइन खरेदीवरही नागरिकांचा कल वाढत आहे, त्यावर देखरेख ठेवावी. कॉस्मेटिक, अॅलोपॅथिक, आयुर्वेदिक उत्पादकांची तपासणी वारंवार होणे आवश्यक आहे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
अन्न व औषध प्रशासनाच्या बळकटीकरणासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातील. बाह्य यंत्रणेमार्फत 60 कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात येईल. प्रशिक्षण आणि प्रयोगशाळेच्या इमारतीसाठी निधी मंजूर झाला आहे. वाहनांचीही पूर्तता बाह्य यंत्रणेतून करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा