![प्रतीक्षा संपली ! पुणे-मिरज रेल्वे वर्षाखेरीस धावण्याची शक्यता](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F01%2FRailway.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुणे : पुढारी वृत्तसेवा : बहुप्रतीक्षित पुणे-मिरज दुहेरीकरणाचे काम आता 84 टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले असून, यातील 60 टक्के दुहेरीकरणाच्या मार्गावर रेल्वेगाडी धावण्यास सुरुवात झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस पुणे-मिरज दुहेरीकरणाच्या 90 ते 100 टक्के मार्गावर रेल्वेगाडी धावणार असल्याची शक्यता रेल्वेच्या वर्तुळातून वर्तविली जात आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागांतर्गत पुणे-मिरज दुहेरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे.
संबंधित बातम्या :
हे काम पूर्ण होऊन पुणे आणि मिरजकरांना वेगवान सेवा मिळावी, याची प्रतीक्षा आहे. मात्र, गेले काही महिने पावसामुळे याचे काम रेंगाळले होते. आता मात्र, ते युद्धपातळीवर सुरू असून, फक्त 16 टक्के काम बाकी राहिले आहे. तेदेखील लवकरात लवकर पूर्ण करणार असल्याचा विश्वास रेल्वेकडून व्यक्त करण्यात आला आहे. पुणे-मिरज मार्गावरील मातीची कामे, मोठे पूल, लहान पूल, रोड ओव्हरबि—ज, बोगदे, स्टेशन बिल्डिंग, ट्रॅक लिंकिंग, सिग्नलिंग इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग, विद्युतीकरण यासह अनेक कामे वेगाने सुरू आहेत. यात साफळे-आदरकी 277 मीटरचा बोगदा पूर्ण झाला आहे. आदरकी-वाठार दरम्यानच्या 169 मीटरच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले असून आंबळे-शिंदवणे जवळच्या 110 मीटर बोगद्याचे काम सुरू आहे. असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
रेल्वेच्या पुणे-मिरज दुहेरीकरणाचे काम 84 टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. आतापर्यंत 60 टक्के मार्गावर गाडी धावण्यास सुरुवात झाली आहे. चालू आर्थिक वर्षात 90 टक्क्यांपर्यंत गाडी सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यासोबतच या मार्गावरील उर्वरित सर्व कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.– डॉ. शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे