पुणे : केरळमध्ये निपाह विषाणूच्या संसर्गामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यासाठी राज्यात निपाहसदृश आजारांचे सर्व स्तरांवर सर्वेक्षण करण्याच्या आणि प्रतिबंधात्मक, नियंत्रणात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. निपाह विषाणूच्या पार्श्वभूमीवर अॅक्युट इन्सेफेलायटिस सिंड्रोम म्हणजेच 'एईएस' रुग्णांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे.
संबंधित बातम्या :
याबाबतचे आदेश सहसंचालक डॉ. प्रतापसिंह सरणीकर यांनी जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि महापालिकांना दिले आहेत. निपाह विषाणूचा संसर्ग झाल्यास ताप, अंगदुखी, डोकेदुखी, झोप येणे, मानसिक गोंधळ उडणे अशी लक्षणे आढळून येतात. आजवरील उद्रेकात मृत्यूचे प्रमाण 40 ते 70 टक्के इतके आहे. संशयित रुग्णाने मागील 3 आठवड्यांत निपाहबाधित भागामध्ये विशेषतः केरळ, ईशान्य भारतात अथवा बांगलादेश सीमेलगतच्या भागात प्रवासाचा इतिहास असल्यास त्यालाही संशयित रुग्ण संबोधावे. अशा रुग्णाला विलगीकरण कक्षात भरती करावे आणि त्याच्या घशातील स्त्रावाचे नमुने राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठवावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा