वडगाव मावळ : धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सुधारित अहवाल सादर करा | पुढारी

वडगाव मावळ : धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सुधारित अहवाल सादर करा

वडगाव मावळ(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी महिनाभरात सुधारित अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली. मावळ तालुक्यातील पवना, आंद्रा, जाधववाडी, भुशी धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक संपन्न झाली.
या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी अजय मोरे, तहसीलदार विक्रम देशमुख, उपअभियंता अशोक शेटे, पवना धरणग्रस्त संयुक्त समिती अध्यक्ष नारायण बोडके, बाळासाहेब मोहोळ, रविकांत रसाळ, मुकुंद काऊर, बाळासाहेब काळे, रवि ठाकर, किसन घरदाळे, मारुती दळवी, दत्तात्रय ठाकर, दत्तात्रय घरदाळे, अंकुश आंबेकर, नारायण ठाकर, दशरथ शिर्के, संतोष कडू, अरविंद रोकडे आदी उपस्थित होते.
मंत्री अनिल पाटील यांनी या वेळी पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा सविस्तर आढावा घेतला. पुनर्वसनाबाबत जलसंपदा व महसूल विभागाने केलेल्या जमीन वाटप अहवालात त्रुटी असल्याने यासंदर्भात दोन्ही विभागाचे संबंधित अधिकार्‍यांनी संयुक्त बैठक घेऊन वाटप क्षेत्र निश्चित करावे व महिनाभरात सर्व तांत्रिक त्रुटी दूर करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

पुनर्वसनाची ही शेवटची मीटिंग; समितीचा इशारा

पवना पुनर्वसनाच्या बाबतीत गेली चार वर्षांपासून आमदार सुनील शेळके यांच्यासह सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. अनेक बैठका झाल्या; परंतु अंतिम निर्णय अजून झालेला नाही. आता ही शेवटची बैठक असून प्रशासनाने महिनाभरात निर्णय न केल्यास होणार्‍या परिणामांना सामोरे जावे, असा इशारा समितीच्या पदाधिकार्‍यांनी बैठकीत दिला आहे.
गेल्या चार वर्षांपासून पवना प्रकल्पग्रस्तांसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करीत आहे. जोपर्यंत पुनर्वसनाचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत आमचा पाठपुरावा सुरूच राहील.
– सुनील शेळके, 
आमदार 
हेही वाचा

Back to top button