पुणे; पुढारी वृत्तसेवा : थेट जलवाहिनीतून सुमारे 21 हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाद्वारे पाणी वितरण करण्याचा जलसंपदा विभागाच्या महत्त्वाकांक्षी गुंजवणी प्रकल्पाचे काम जोरात सुरू झाले होते. मात्र, पावसाळ्याचे कारण देत पुन्हा हे काम बंद पडले आहे. आतापर्यंत सात किलोमीटर भूमिगत जलवाहिन्यांची जोडणी पूर्ण करण्यात आली आहे. उर्वरित जलवाहिन्या जोडण्याचे सुरू असलेले काम सध्या थांबविण्यात आले आहे. शेतकर्यांना थेट बंद जलवाहिनीतून सिंचनासाठी पाणी वितरित करणारा गुंजवणी प्रकल्प केंंद्र सरकारच्या पीआयएन (पाइप्ड इरिगेशन नेटवर्क) या धोरणानुसार साकारण्यात येत आहे.
गुंजवणी प्रकल्पाची क्षमता 4.17 अब्ज घनफूट (टीएमसी) असून, त्याद्वारे भोर, वेल्हा, पुरंदर या तीन तालुक्यांमधील 21 हजार 392 हेक्टर क्षेत्राला पाणी मिळणार आहे. वर्षभर 24 तास विजेशिवाय उच्चदाबाने प्रतिशेतकरी सहा एकरी पाणी असा निकष ठरवून पाणी वितरित करण्यात येणार आहे. या प्रकल्पाद्वारे 83.700 कि.मी. लांबीची बंद वाहिनी डावा कालवा आणि 20.378 कि.मी. लांबीचा उजवा कालवा करण्यात येणार आहे. त्याद्वारे वेल्हे तालुक्यातील 850 हेक्टर, भोरमधील 9535 हे. आणि पुरंदर तालुक्यातील 11 हजार 107 हे. क्षेत्राला सिंचनाचा लाभ देण्याचे प्रस्तावित आहे.
दरम्यान, नियोजनानुसार प्रकल्पासाठी आवश्यक जलवाहिन्या तयार करून त्या प्रकल्पाच्या ठिकाणी आणण्यात आल्या. तसेच बृहत आराखड्यानुसार आतापर्यंत सात कि.मी. भूमिगत जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. भूमिगत जलवाहिन्या असल्याने मोठे उत्खनन करावे लागते. या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पातही निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून काम सुरू होते. मध्यंतरी या प्रकल्पाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या होत्या, कोरोनामुळे काम बंद पडले होते. या समस्यांमधून मार्ग काढत भूमिगत जलवाहिन्या जोडणीच्या कामाला प्रारंभ करण्यात आला होता. मात्र, पावसाळा सुरू असल्याने खोदकाम करता येत नसल्याचे कारण जलसंपदा विभागाकडून देण्यात येत आहे. परिणामी, सध्या हे काम बंद असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.
बंद जलवाहिनी टाकण्यात येणार असल्याने पाणीचोरी, बाष्पीभवन, गळती आणि दूषित पाणी याला पूर्णपणे आळा बसणार आहे. परिणामी, पाणी बचत होऊन प्रकल्पाची कार्यक्षमता वाढणार आहे. कोणताही वीज अथवा पंप न वापरता पाणी वितरण व्यवस्था करण्यात आल्याने आर्थिक खर्च कमी होणार आहे. पाणी वितरणासाठी धरणातील पाण्याच्या दाबाचा उपयोग करण्यात आल्याने सूक्ष्म सिंचनाचे धरण ते तीन हेक्टर क्षेत्रापर्यंत बंदिस्त वाहिनीद्वारे पाणी देणे शक्य आहे.
हेहा वाचा