आंबेगाव, जुन्नर, शिरूर पूर्व भागात चारा छावण्या सुरू करा : दिलीप वळसे पाटील
मंचर : पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव, जुन्नर व शिरूर तालुक्यांच्या पूर्व भागातील काही गावांमध्ये अतिशय कमी पाऊस पडला आहे. त्या ठिकाणी जनावरांसाठी चार्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी शासनाने चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी सूचना सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना केली. घोडेगाव येथे झालेल्या आढावा बैठकीत वळसे पाटील बोलत होते. त्यांनी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार संजय नागटिळक यांच्याकडून पावसाची आकडेवारी व दोन तालुक्यांतील परिस्थिती समजून घेतली. अनेक गावांमध्ये सरासरीपेक्षा 20 टक्केच पाऊस झाला आहे.
काही गावांमध्ये अजूनही पिण्यासाठी पाण्याचे टँकर सुरू आहेत. तसेच जनावरांसाठीच्या चार्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. गावांत चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी शेतकर्यांसह सरपंचांनी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली. पावसाची परिस्थिती पाहता दरवर्षीच्या तुलनेत फार कमी पाऊस पडला आहे. पुढे पाऊस झाला नाही तर गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. हे लक्षात घेता शासनाने आतापासून ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे. चार्याची टंचाई असलेल्या गावांमध्ये चारा छावण्या सुरू केल्या जाव्यात, अशा सूचना वळसे पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना दुरध्वनीद्वारे दिल्या. तसेच याबाबतचे प्रस्ताव प्रांताधिकारी यांनी बनवून वरिष्ठ कार्यालयात तत्काळ मंजुरीसाठी पाठवावेत, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा :
Landslide in Manipur : मणिपूरमध्ये मुसळधार पावसाने भूस्खलन; महामार्ग ठप्प, 500 ट्रक अडकले