पुण्यातील मस्तानी तलाव कोरडा होण्याच्या मार्गावर
दिवे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : दिवे आणि परिसरात पावसाने प्रचंड ओढ दिल्याने बळीराजा मेटाकुटीला आला आहे. पुरंदर व हवेली तालुक्याच्या सीमेवर घाटमाथ्यावर चांगला पाऊस झाला, तर ते पाणी ऐतिहासिक मस्तानी तलावात येते. मात्र, या वर्षी पावसाने ओढ दिल्याने मस्तानी तलावात अत्यल्प साठा असून, हा तलाव कोरडा पडण्याच्या मार्गावर आहे.
मस्तानी तलाव वडकी गावच्या हद्दीत डोंगरालगत आहे. त्यामुळे हा तलाव भरल्यास वडकी गावातील शेतीला याचा खूप फायदा होतो; शिवाय पर्यटनाच्या दृष्टीनेदेखील हा तलाव महत्त्वाचा आहे. अतिशय आखीवरेखीव असे या तलावाचे बांधकाम आहे; शिवाय येथून पूर्वी अनेक भुयारी मार्ग असल्याचे सांगितले जाते. त्याच्या खुणा आजदेखील येथे दिसतात.
येथूनच पुण्यातील शनिवारवाड्यात एक मार्ग जात असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हा परिसर पर्यटकांनी नेहमीच फुललेला असतो. या वर्षी मात्र आता अगदी ऑगस्ट महिना अर्ध्यावर आला, तरीदेखील या तलावात अजिबात पाणीसाठा वाढलेला नाही. सध्या मागच्याच वर्षीचा अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे परिसरातील शेतकर्यांचादेखील जीव टांगणीला लागला आहे.
हेही वाचा
नगर : चांदा दरोड्यातील तिघांना अटक
रत्नागिरी : पॅरोलची रजा संपूनही हजर न झालेल्या आरोपीवर गुन्हा दाखल