भोर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : हिंदवी स्वराज्याची साक्ष देणारा किल्ले रोहिडेश्वर (रोहिडा) गडावर जाणाऱ्या प्रथमदर्शनीय प्रवेशद्वाराजवळील तटबंदी बुरुंज पावसामुळे ढासळला. यामुळे ज्या वाटेने पर्यटक गडावर जातात त्या पायवाटेवर दगडी, माती, राडारोडा आल्याने पायवाट बंद झाली आहे. काही ठिकाणी मोठमोठ्या भेगा पडल्या असल्यामुळे तटबंदी धोक्याची असल्याचे गडकरी शंकर धावले, चंद्रकांत भागवत यांनी सांगितले.
भोरपासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या किल्ले रोहिडेश्वर (रोहिडा) च्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील तटबंदी बुधवारी (दि. १०) रात्रीच्या वेळी मुसळधार पावसामुळे ढासळली. यामुळे गडावर पर्यटकांना जाणे अवघड झाले आहे, तर काही ठिकाणी पावसामुळे भेगा पडल्या असल्यामुळे तटबंदी ढसाळण्याच्या अवस्थेत आहे. ढासळलेल्या तटबंदीचा दगडी, माती, चुनखडीचा राडारोडा हा पर्यटक ज्या वाटेने गडावर चढतात त्या वाटेवर आला असल्यामुळे गडावरील पाया वाट बंद झालेली आहे. गडावर जाताना पर्यटकांनी काळजी घावी. असे, आवाहन बाजारवाडी ग्रामस्थांनी केलेले आहे.
स्वराज्य स्थापनेत शिवाजी महाराजांनी किल्ल्याचा अतिशय समर्पक उपयोग करून मराठ्यांचे स्वराज्य निर्माण केले अशा शिवकाळातील आणि घटकांचा मुख साक्षीदार असलेला रोहिडा किल्ला भोर तालुक्यातील बाजारवाडीजवळ आहे. ऐतिहासिक कागदपत्रातून याला 'विचित्रगड' व 'बिनीचा किल्ला' अशा नावाने देखील संबोधले जाते. गडाची समुद्रसपाटीपासून उंची १ हजार १०५ मीटर म्हणजेच ३ हजार ६२५ फूट आहे. बाजारवाडी गावापासून किल्ल्यावर चढण्यासाठी सर्वात चांगली मळलेली पायवाट असून गडावर चढण्यासाठी एक तास लागतो. गडावर प्रवेश करण्यासाठी एकमेव दरवाजा असून त्याची बांधकाम शैली अशी आहे की, दरवाजा आपणास दिसून येत नाही.
हा दरवाजा उत्तराभिमुख आहे. प्रथमदर्शनी असलेल्या दरवाजाच्या चौकटीवर भक्कम गणेश पट्टी असून तिच्यावर मिहराब आहे. याच प्रवेशद्वाराच्या शेजारील असणारी तटबंदी बुरुंज पावसामुळे ढासळला असल्यामुळे गडाचे ऐतिहासिक महत्व कमी झालेले दिसत आहे. शासन एकीकडे गड संवर्धन नावाच्या खाली कोट्यावधी रुपये ठराविक गडकिल्ल्यांसाठी खर्च करत आहेत. परंतु जे किल्ले पुरातत्व खात्याकडे आहेत त्या किल्ल्यासाठी शासन निधी उपलब्ध करत नसल्याचे दिसून येत आहे.
शिवप्रभूंच्या स्वराज्य स्थापनेत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या भोर तालुक्याच्या भूमीतील किल्ले रोहिडाबाबत शासन स्तरावरील अनास्थेचा परिणाम म्हणजे दरवाजाजवळील तटबंदी ढासळली आहे. इतिहासाचे मूक साक्षीदार असलेले किल्ले संवर्धन फक्त कागदावरच असल्याचे एक उदाहरण होय.
– सुरेश शिंदे, इतिहास तज्ञ
पर्यटकांच्या दृष्टीने रोहिडेश्वर (रोहिडा) हा ऐतिहासिक किल्ला असून गड पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करत असतात. किल्ल्याच्या संवर्धनासाठी शासन निधी उपलब्ध करत नसल्यामुळे गडाची तटबंदी पावसाळ्यामध्ये ढासळण्याचे प्रमाण वाढत आहे. तरी पुरातत्त्व खात्याने किल्ले रोहिडेश्वर (रोहिडा) च्या संवर्धनसाठी निधी उपलब्ध करून द्यावा.
– सीताबाई गुरव,
सरपंच, बाजारवाडी
हेही वाचा