

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या कृषी विभागामार्फत खरीप हंगाम 2023 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत मूग व उडीद पिकांसाठी 31 जुलै, तर उर्वरित पिकांसाठी 31 ऑगस्ट 2023 पर्यंत आहे. तरी या पीक स्पर्धेत जास्तीत जास्त शेतकर्यांनी सहभागी होण्याचे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे. भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल या 11 पिकांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्ररीत्या भरावयाचे असून, सर्वसाधारण गटासाठी 300 रुपये व आदिवासी गटासाठी 150 रुपये असेल. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकर्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वत: कसत असणे आवश्यक आहे.
शेतकर्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेऊ इच्छिणार्या स्पर्धकाची स्वत:च्या शेतात भात पिकाच्या बाबतीत किमान 20 गुंठे व इतर पिकांच्या बाबतीत किमान 40 गुंठे (1 एकर) क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पीक स्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार असून, सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन आणि शेतकर्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकर्यांची निवड करण्यात येणार आहे. राज्यातील पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकर्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते.
अशा प्रयोगशील शेतकर्यांच्या गौरवातून त्यांचे मनोबल वाढते आणि त्यांच्या परिसरातील शेतकर्यांना मार्गदर्शन मिळून एकूण पिकांची उत्पादकता वाढीस मदत होते. स्पर्धेबाबतच्या अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या https:// www. krishi. maharashtra. gov. in या संकेतस्थळाला किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषी विस्तार विभागाचे सह संचालक सुनील बोरकर यांनी केले आहे.
अर्जासोबत कोणती कागदपत्रे हवीत
शेतकर्यांनी विहित नमुन्यातील अर्ज देण्याबरोबर विहित प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, 7/12 उतारा, 8-अ चा उतारा, पीकस्पर्धेसाठी शेतकर्याने संबंधित 7/12 वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते, चेक-पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, आदिवासी शेतकरी असल्यास जात प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील.
2 हजार ते 50 हजारांचे बक्षीस…..
सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकर्यांसाठी तालुका पातळीवर प्रथम 5 हजार रुपये, द्वितीय 3 हजार व तृतीय 2 हजार रुपये असे बक्षिसाचे स्वरूप असेल. तर जिल्हा पातळीवर 10 हजार, 7 हजार व 5 हजार रुपये असे अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय बक्षीस तसेच राज्यपातळीवर प्रथम बक्षीस 50 हजार रुपये, द्वितीय 40 हजार, तर तृतीय बक्षीस 30 हजार रुपये राहील.
हेही वाचा :