शिवाजी शिंदे :
पुणे : राज्यातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी नागरिकांनी ऑनलाइन तक्रारी कराव्यात, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने अॅप तयार केले. त्यावर खड्डे पडल्याच्या तक्रारी फोटोसह टाकल्या. मात्र, या तक्रारी निवारण्यासाठी या विभागाकडे यंत्रणाच नसल्याचे समोर आले. परिणामी आतापर्यंत एकही खड्डा बुजविण्यात आला नाही. यात ही सर्व यंत्रणा सपशेल 'फेल' झाली आहे.
राज्यात एक लाख पाच हजार किलोमीटरचे रस्ते, 33 हजार रस्ते आहेत. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेल्या पॉटहोल कप्लेंट रिद्रेड्रेसल सिस्टिम (पीसीआरएस) उपाययोजनेची सुविधा सुरू केली आहे. या अॅपवर नागरिकांना आपले अभिप्राय, सूचना, तक्रारी देता येतील. नागरिकांच्या तक्रारींची माहिती संबंधित अभियंत्याला दिली जाईल आणि त्यानुसार रस्त्यांवरील खड्डे भरणे आदी कामे विहित वेळेत करून दुरुस्तीचे छायाचित्र अपलोड करून संबंधित नागरिकाला संदेशाद्वारे कळविण्यात येईल, अशी ही यंत्रणा आहे. तीन महिन्यांपूर्वी याची घोषणा झाली. लागलीच त्याची अंमलबजावजावणीदेखील या विभागाने सुरू केली.
या अॅपची माहिती नागरिकांना दिली. त्यानुसार राज्यातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची माहिती नागरिकांनी छायाचित्रांसह देण्यास सुरुवात केली. मात्र, खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने अजून एजन्सी नेमलेली नाही. त्यामुळे सर्व खड्डे आहे त्याच अवस्थेत आहेत. या विभागातील अधिकार्यांच्या धरसोड वृत्तीमुळे नामुष्कीची वेळ याच विभागावर आली आहे.
दोन महिन्यांत हजाराहून अधिक तक्रारी
या विभागाने सुरू केलेल्या अॅपवर गेल्या दोन महिन्यांत 1 हजार 20 हून अधिक तक्रारी छायाचित्रांसह दाखल झालेल्या आहेत. त्यातही पुणे शहर व जिल्ह्यातून सर्वाधिक म्हणजेच 900 तक्रारी दाखल झालेल्या आहेत, तर नाशिक 25, संंभाजीनगर- 2, नांदेड-13, अमरावती-33, नागपूर-33 या जिल्ह्यांतून आतापर्यंत तक्रारी आलेल्या आहेत. उर्वरित जिल्ह्यांतून तक्रारी येण्याचे प्रमाण नगण्य असल्याचे दिसून आले आहे.
हेही वाचा: