नेत्रपेढ्यांची संख्या घटली ; पुण्यात सध्या 14 पैकी आठच कार्यान्वित | पुढारी

नेत्रपेढ्यांची संख्या घटली ; पुण्यात सध्या 14 पैकी आठच कार्यान्वित

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  कोरोनानंतर मंदावलेली नेत्रदानाची चळवळ, कार्यपद्धतीतील अडथळे, शासनाची उदासीनता अशा अनेक कारणांमुळे दोन वर्षांत सहा नेत्रपेढ्या बंद पडल्या आहेत. शहरात 2020 मध्ये 14 नेत्रपेढ्या होत्या. सध्या केवळ आठ कार्यान्वित आहेत.
नेत्रदानाबाबत अनेक गैरसमज असल्याने नेत्रदानाचे प्रमाणही कमी आहे. देशात दर वर्षी 1 लाख डोळ्यांची आवश्यकता असताना केवळ 26 हजार नेत्रदान होते. नेत्रदानाला प्रतिसाद मिळत नसल्याने नेत्रपेढ्या चालवण्यातही अडचण निर्माण होत आहे.

शहरात ससून रुग्णालयासह जवळपास 8 नेत्रपेढ्या कार्यरत आहेत. नेत्रदानाला बळकटी मिळावी, यासाठी नेत्रपेढ्यांमध्ये समन्वय आणि शासनाचा सहभाग आवश्यक असल्याचे नेत्रतज्ज्ञांचे मत अधोरेखित होत आहे. नेत्रपेढी सुरू करण्यासाठी आवश्यक असणारी साधनसामग्री, मनुष्यबळ, कागदपत्रे पुरेशी असतील, तर जिल्हा नेत्रतज्ज्ञांकडे अर्ज करावा लागतो. सर्व अटींची पूर्तता केल्यावर नेत्रपेढी चालवण्याचा परवाना मिळतो, अशी माहिती नेत्रतज्ज्ञ डॉ. संजय पाटील यांनी दिली.

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर सहा तासांच्या आत डोळे काढणे आवश्यक असते. यासाठी मृत्यू दाखला, मृत्यूचे कारण, दात्याची वैद्यकीय आणि सामाजिक पार्श्वभूमी, नातेवाईकांची संमती अशी प्रक्रिया पूर्ण केली जाते. दात्याच्या रक्ताचे नमुने घेऊन एचआयव्ही, हिपॅटिटिस, सिफिलिस आदी तपासण्या केल्या जातात. डोळे प्रत्यारोपणायोग्य आहेत की नाहीत, याचीही बारकाईने
तपासणी केली जाते.
                               – डॉ. संजीवनी अभ्यंकर, नेत्रविभाग प्रमुख, ससून रुग्णालय

देशातील एकूण नेत्रपेढ्यांपैकी महाराष्ट्रात जास्त असून, नेत्रदानाचे प्रमाण मात्र कमी आहे. आपल्याकडे नेत्रदान चळवळ अद्याप जनजागृती पातळीवर आहे. श्रीलंकेमध्ये डोळे ही राष्ट्रीय संपत्ती घोषित करण्यात आली असून, नेत्रदान सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे श्रीलंकेतून जगभरात डोळयांची निर्यात केली जाते. आपल्याकडे सक्ती करता येणे शक्य नसले, तरी बेवारस, अनोळखी, मेंदूमृत व्यक्तींचे नेत्रदान करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यायला हवा. त्यासाठी शासनाने प्रोत्साहन द्यायला हवे.
                                                                              – डॉ. संजय पाटील, नेत्रतज्ज्ञ

तीन वर्षांत 1711 अंध व्यक्तींना मिळाली दृष्टी
अंधत्व नियंत्रण समितीकडील माहितीनुसार, कोरोनानंतर शहरातील नेत्रपेढ्यांची संख्या घटली आहे. शहरात गेल्या तीन वर्षांत 2 हजार 565 जणांनी केलेल्या नेत्रदानातून 1711 अंध व्यक्तींना दृष्टी मिळाली असल्याचे सांगण्यात आले.

हे ही वाचा : 

वर्षा पर्यटनाची मौज नडली; तीन जिल्ह्यांत सात पर्यटकांचा बुडून मृत्यू

Monsoon Session : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे अनेक आमदार अनुपस्थित

 

Back to top button