अजित पवारांच्या मागणीचा निर्णय पक्षातील प्रमुख लोक घेतील : शरद पवार | पुढारी

अजित पवारांच्या मागणीचा निर्णय पक्षातील प्रमुख लोक घेतील : शरद पवार

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  अजित पवार यांनी पक्ष संघटनेतील पदाची मागणी केली आहे, परंतु हा निर्णय मी एकटा घेत नाही. त्यांनी इच्छा व्यक्त केली असेल तर पक्षातील प्रमुख लोक बसून त्यातून निर्णय होईल. बारामतीत सोमवारी (दि. २६) सकाळी पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, पक्ष संघटनेच्या कामात सर्वांनी लक्ष घालावे अशी प्रत्येकाचीच भावना आहे. तेच मत अजित पवार यांनी पक्षाच्या व्यासपीठावर व्यक्त केले आहे, त्यात यापेक्षा वेगळे काही नाही.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रातील कांद्यांच्या प्रश्नात हात घातल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, महाराष्ट्राचा विचार केला तर कांदा हे पिक फक्त पश्चिम महाराष्ट्रात होतो.  नाशिक, धुळे व तीन चार जिल्ह्यात जिरायत शेतकरी कांदा पिक घेतात. काही वृत्तपत्रात अशी माहिती आली आहे की, येथील शेतकऱयांनी कांदा विक्रीसाठी हैद्राबादला नेला. तेथे त्यांची फजिती झाली. त्यामुळे हे थोडे राजकीयदृष्ट्या वेगळे चित्र दाखवू शकतो, एवढाच त्यांचा प्रयत्न. त्यांना सेवा करायची असेल तर त्यांचे स्वागत आहे. राव करत असलेल्या शक्तीप्रदर्शनाबाबत ते म्हणाले, त्यांच्याकडे साधन, संपत्तीची चिंता नाही. त्यामुळे त्यांचा तो अधिकार आहे. आगामी काळात ते आव्हान निर्माण करतील का हे निवडणूकीतच दिसेल.
पाटण्यातील बैठकीत १९ पंतप्रधान एकत्र आले होते, या विरोधकांच्या टीकेवर पवार म्हणाले, हे त्यांचे पोरकटपणाचे भाष्य आहे. या बैठकीत पंतप्रधान या विषयाची चर्चा झाली नाही. महागाई, बेरोजगारी, सांप्रदायिक शक्ती वाढविण्याचा प्रयत्न होत असल्याबद्दल बैठकीत चर्चा झाली.  कोणत्याही राज्यात जाती-धर्मात मतभेद वाढले तर समाजाच्या दृष्टीने ते चांगले नाही. सत्ताधारी भाजप तशी पावले टाकत आहे. या सगळ्या गोष्टींना आवर घालण्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे, हा बैठकीत चर्चेचा विषय होता. पण गेली दोन-तीन दिवस अनेक तथाकथित लोक यावर टीका करत आहेत. लोकशाहीत बैठकीची परवानगी नाही का असा सवाल त्यांनी केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, बैठकीची गरज काय होती. पण मुंबईमध्ये मित्र पक्षांची बैठक भाजप घेणार असल्याची बातमी वाचण्यात आली. मग तुम्हाला बैठका घेता येतात इतरांनी घेतल्या तर त्यात चुकीचे काय. ‘मॅच्युअर पाॅलिटीक्स’ची कमतरता आहे, एवढेच मी याबाबत म्हणू शकेल.
राष्ट्रवादीत ओबीसींना पुरेशी संधी मिळत नसल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, आमच्या पक्षाचे राज्याचे पहिले अध्यक्ष छगन भुजबळ होते. नंतरच्या काळात मधुकर पिचड, सुनील तटकरे अशा अनेकांना संधी मिळाली. त्यामुळे याबाबत विरोधकांकडून आरोप होत असतील तर त्यांचे वाचन कमी असेल. या बाबींची नोंद न घेता ते विधाने करतात. पण लोकांना सगळे माहित असते.  कर्नाटक सरकारने चांगल्या योजना हाती घेतल्या आहेत. भविष्यात काॅंग्रेस-राष्ट्रवादीचे राज्य आल्यावर त्या येथे राबवाव्यात अशी मागणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे. पण त्या राज्य आल्यावर करायच्या गोष्टी आहेत. अजून राज्य आलेले नाही, असेही पवार म्हणाले.
फडणवीस यांना इतिहास माहित नसावा 
देवेंद्र फडणवीस यांच्या एकनाथ शिंदे यांनी केली तर बेईमानी व पवारांनी केली तर मुत्सदेगीरी या वक्तव्यावर पवार यांनी मी बेईमानी कधी केली हे त्यांनी सांगावे, असा सवाल केला. १९७७ साली आम्ही सरकार बनवले. पण त्यात भाजप माझ्यासोबत होता. त्यामुळे त्यांना कदाचित पूर्वीचा इतिहास माहित नसेल. त्यांच्या माहितीसाठी सांगतो, मी जे सरकार बनवले ते सगळ्यांना घेवून केले. त्यात त्यावेळचा जनसंघ, त्याचे उत्तमराव पाटील उपमुख्यमंत्री होते, आणखी काही सदस्य होते. मला वाटते ते प्राथमिक शाळेत कदाचित असतील त्यामुळे त्यांना त्या काळातील माहिती नसेल. त्यामुळे ते अज्ञानापोटी अशी वक्तव्ये करतात यापेक्षा जास्त काही भाष्य करायची गरज नाही असे पवार म्हणाले.
हे ही वाचा : 

Back to top button