मोशी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : मोशीतील बनकरवस्ती येथे गेल्या अनेक दिवसांपासून गटाराचे दुर्गंधीयुक्त पाणी पुणे-नाशिक महामार्गावर येऊन वाहत आहे. पाण्याच्या दुर्गर्ंधीमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संजय गांधीनगर येथील गटाराचे पाणी महामार्गाच्या पश्चिमेकडून वाहत येऊन बनकर वस्तीपर्यंत येते. तेथून मोरीखालून हे पाणी महामार्गाच्या पूर्वेकडे येऊन ते रस्त्यावर वाहत आहे.
या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे महामार्गाच्या कडेला असणार्या बनकर वस्ती (पूर्व), जांभूळकर नगर, नवचैतन्य नगर येथील स्थानिक नागरीक व व्यावसायिक यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेत अनेकदा तक्रार करूनदेखील यावर कायम स्वरूपी उपाय योजना केल्या जात नसल्याने येथील नागरिक हैराण झाले आहेत. हे पाणी महामार्गावर येत असल्याने वाहनचालकांनादेखील याचा त्रास होत आहे, वाहन घसरून अपघात होऊ लागले आहेत,घाण पाणी अंगावर उडून कपडे खराब होत असल्याने दुचाकी चालक हैराण झाले आहेत.
पावसाळ्यात तर हे पाणी मोठ्याप्रमाणात थेट महामार्गावर येऊन वाहन चालक व पादचारी यांची तारांबळ उडवते, यावर संबंधित विभागाने त्वरीत कार्यवाही करावी, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत. याबाबत स्थानिक नागरिक संतोष बोराटे यांनी सांगितले की, बनकर वस्ती ते बोराटे वस्ती या ठिकाणी पुणे-नाशिक महामार्गाच्या दोन्ही बाजूस बंदिस्त गटार नसल्याने सतत गटाराचे दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असते.
अनेक वर्षांपासून येथील नागरिक हा त्रास सहन करत आहेत. महामार्ग प्राधिकरण व पिंपरी चिंचवड महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करत आहेत. महामार्ग रुंदीकरण करण्यात येईल तेव्हा हे काम होईल, अशा प्रकारची उत्तरे मिळत आहेत. दोन्ही प्रशासनाने समन्वयातून हा प्रश्न मार्गी लावून येथील नागरिकांची दुर्गंधीतून सुटका करावी.
हेही वाचा