पुणे : फुरसुंगी, उरुळी देवाचीबाबत हरकतींवरील सुनावणी पूर्ण

पुणे : फुरसुंगी, उरुळी देवाचीबाबत हरकतींवरील सुनावणी पूर्ण

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही गावे पालिकेतून वगळून या दोन गावांसाठी स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्याच्या अधिसूचनेवर तब्बल साडेचार हजार हरकती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाखल झाल्या होत्या. या हरकतींवरील सुनावणी पूर्ण झाली आहे. सुनावण्यांचा अहवाल लवकरच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे सुपूर्त केला जाणार आहे. फुरसुंगी, उरुळी देवाची ही दोन गावे पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आली.

त्यानंतर येथे महापालिकेने आकारलेला कर जास्त असल्याने आणि कोणत्याही सुविधा मिळत नसल्याचा दावा करीत या गावांनी महापालिकेतून वगळण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 6 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या बैठकीत केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी फुरसुंगी, उरुळी देवाची ही गावे वगळण्याचे जाहीर केले. त्यानुसार महापालिका प्रशासनाने प्रक्रिया सुरू करून शासनाकडे अहवाल पाठविला होता. याबाबतची प्रारूप अधिसूचना चालू वर्षी 31 मार्च रोजी प्रसृत केली. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडे नागरिकांनी हरकती नोंदविल्या आहेत

महिनाभरात जिल्हा प्रशासनाकडे साडेचार हजारांहून अधिक हरकती-सूचना प्राप्त झाल्या होत्या. हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्याकडून हवेली प्रांत यांची नियुक्ती केली होती. त्यांच्याकडून प्राप्त हरकती, सूचनांवरील सुनावणी पूर्ण झाली आहे. सध्या संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुणे जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात मार्गस्थ झाल्यानंतर सुनावण्यांचा अहवाल जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्याकडे सुपूर्त केला जाणार आहे.

हे ही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news