

Pune: कंत्राटदाराने धान्याची उचल उशिरा केल्याने शहर आणि जिल्ह्यात 90 टक्केच ग्राहकांना धान्य वाटप झाले आहे. शहरात दर महिन्याला सरासरी 90 ते 92 टक्के आणि जिल्ह्यात 98 टक्के धान्याचे वाटप होत असते. मात्र, नोव्हेंबर महिन्यात कंत्राटदाराने रेशन दुकानदारांना धान्य उशिरा पोहोचविल्याने जिल्ह्यातील 57 हजार 763 शिधापत्रिकाधारक अन्नधान्यापासून वंचित राहिले आहेत. महिना संपल्याने या ग्राहकांना नोव्हेंबरचे धान्य डिसेंबरमध्ये मिळणार नसल्याचे अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यात 6 लाख 29 हजार 896 शिधापत्रिकाधारक आहेत. त्यांना 1 हजार 857 रेशन दुकानाच्या माध्यमातून धान्याचे वाटप करण्यात येते. अंत्योदय योजनेत 754 टन गहू, तर 907 टन तांदूळ दिला जातो, तर प्राधान्य योजनेत 4 हजार 720 टन गहू व 7 हजार 183 टन तांदूळ वाटप केला जातो. त्या त्या महिन्याचे धान्य वाटप 30 तारखेपर्यंत करावे लागते. त्यानंतर ई-पॉस मशिन बंद होतात. त्यामुळे उर्वरित ग्राहकांना धान्य वाटप करता येत नाही.
नोव्हेंबर महिन्यात 6 लाख 29 हजार 896 शिधापत्रिकांपैकी 5 लाख 72 हजार 133 म्हणजेच 90.82 टक्के ग्राहकांना धान्यांचे वाटप झाले आहे. जिल्ह्यात दर महिन्याला सरासरी 98 ते 99 टक्के ग्राहकांना धान्य वाटप होते. कंत्राटदाराने केलेल्या गोंधळामुळे रेशन दुकानदारांपर्यंत धान्य वेळेत पोहचू शकले नाही. यामुळे नोव्हेंबर महिन्यात 57 हजार 763 शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळाले नाही.
शहर आणि जिल्ह्यातील रेशन दुकानदारांपर्यंत धान्य पोहचविण्याचे काम एकाच कंत्राटदाराकडे आहे. शहरातसुद्धा उशिरा धान्य पोहचले. शहरात दर महिन्याला सरासरी 91 ते 92 टक्के धान्याचे वाटप होते. नोव्हेंबरमध्ये शहरात 89 टक्के धान्याचे वाटप झाले आहे. धान्य उशिरा पोहचले, तरीही वाटपावर काही परिणाम झाला नसल्याचा दावा अन्नधान्य वितरण विभागाकडून करण्यात आला आहे.
या गोंधळामुळे धान्य वाटप करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव विभागाकडे पाठविण्यात आला होता, अशी माहिती जिल्हा पुरवठढा विभागाकडून देण्यात आली होती. मात्र, प्रस्तावाला मान्यता मिळणार नसल्याचे अधिकार्यांकडून सांगण्यात आले.
शहरात दर महिन्याला सरासरी 90 ते 91 टक्के ग्राहकांना धान्याचे वाटप होते. मागच्या महिन्यात कंत्राटदाराने धान्य उशिरा पोहचविले, तरी वाटपावर फार परिणाम झालेला नाही.
- प्रशांत खताळ, अन्नधान्य वितरण अधिकारी