पुणे; पुढारी वृत्तसेवा : 'प्रगल्भ समाज घडविण्यासाठी विचारवंत-कलावंतांची आवश्यकता असते. साहित्य श्रेष्ठ की कला श्रेष्ठ, हे पाहण्यापेक्षा भाषा व्यवहार महत्त्वाचा ठरतो. पण, आज शब्दरूपी देवाची विटंबना होताना दिसत आहे, शब्दांकडे देव म्हणून बघितले गेले पाहिजे,' असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
राजारामबापू पाटील ललित कला अकादमीतर्फे आयोजित लोकनेते राजारामबापू पाटील पहिला राष्ट्रीय ललित कला सन्मान कार्यक्रम झाला. या वेळी साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. सदानंद मोरे यांना ललित कला जीवनगौरव सन्मान प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. याशिवाय, ललित कला सन्मान मंगेश काळे, प्रा. इंद्रजित भालेराव आणि मोनिका गजेंद्रगडकर यांना देण्यात आला. माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले.
प्रा. इंद्रजित भालेराव यांच्या वतीने त्यांचा मुलगा चंद्रगुप्त भालेराव यांनी पुरस्कार स्वीकारला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रा. प्रदीप पाटील, सुनीताराजे पवार, विलास लांडे, अंकुश काकडे आदी उपस्थित होते. शब्द जपून वापरावेत, असा आज काळ आल्याची टिप्पणी करून पवार म्हणाले, 'आज लोकशाहीचे खरे रूप असे आहे की राजकारणी व्यक्ती खासगीत खरे बोलतात, पण माईकवर खोटे बोलतात. राजकारणी माईकवर खरे बोलतील तेव्हा ती खरी लोकशाही ठरेल.' जयंत पाटील म्हणाले, 'आज काळ बदलला आहे. पूर्वीच्या काळी प्रतिभावंत होते त्याचप्रमाणे त्यांची कदर करणारेही होते. आता प्रतिभावंत आहेत, पण आज मोबाईलच्या जमान्यात कदर करणारे लोक राहिलेले नाहीत.'
हेही वाचा