कारागृहातून सुटल्यानंतर खंडणीसाठी तरुणाच्‍या खुनाचा प्रयत्न | पुढारी

कारागृहातून सुटल्यानंतर खंडणीसाठी तरुणाच्‍या खुनाचा प्रयत्न

पुणे; पुढारी वृत्तसेवा

कारागृहातून सहा महिन्‍यांनी सुटल्यावर खंडणीसाठी सराईत गुन्हेगाराने आपल्‍या साथीदारांसह पान टपरी चालकाच्‍या खुनाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार कोंढवा येथे घडला. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात अनिल रमेश चव्हाण (वय 20, रा. अप्पर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंगेश अनिल माने (वय 23, रा. सुखसागरनगर), अखिलेश उर्फ लाड्या कलशेट्टी (रा. गोकुळनगर), सुरज बोकेफोडे (रा. माऊली नगर), सागर जाधव (रा. सुखसागरनगर) आणि त्यांचे  तीन साथीदारांवर गुन्‍हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराची कोंढवा बुद्रुक येथील साळवे गार्डन येथे पानटपरी आहे. मंगेश माने हा सराईत गुन्हेगार असून तो बिबवेवाडी पोलिस ठाण्यातील खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात कारागृहात पाच ते सहा महिने होता. तो नुकताच कारागृहातून बाहेर आला होता. शुक्रवारी तो अनिल चव्हाण यांना भेटला. त्याने चव्हाण यांच्याकडे कारागृहात असताना थकलेली खंडणी मागितली.

पानटपरी सुरू ठेवायची असल्यास पैसे दे, अशी मागणी आरोपींनी केली. ती पूर्ण न केल्याने आरोपींनी तक्रारदाराला लाथाबुक्क्यांनी आणि तलवारीने मारहाण केली. तसेच, तेथे भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या तक्रारदाराच्या मित्रावर देखील तलवारीने वार केले. याप्रकरणी खुनाचा प्रयत्न, मारहाण, धमकावणे, आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला आहे. कोंढवा पोलिस या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक स्वराज पाटील करत आहेत.

पानटपरी सुरू ठेवण्यासाठी खंडणी न दिल्याने सहा ते सात जणांच्या टोळक्याने पानटपरी चालकाला बेदम मारहाण केली. तलवार हल्‍ला करुन खून करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी खुनाच्या प्रयत्नचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणात खंडणी हा मूळ हेतू असल्याने याप्रकरणात खंडणीच्या कलमाची वाढ करण्यात येणार आहे.

 स्वराज पाटील, सहायक पोलिस निरीक्षक, कोंढवा पोलिस ठाणे

हेही वाचलं का?

 

Back to top button