

कडूस(पुणे); पुढारी वृत्तसेवा : खेडसह शिरूर तालुक्याला वरदान ठरलेल्या ८.५३ टीएमसी क्षमता असलेले चासकमान धरणात सध्या ५०.५१ टक्के म्हणजेच ४.७८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. यामध्ये उपयुक्त पाणीसाठा हा ३.८२ टीएमसी असल्याची माहिती उपविभागिय अधिकारी डी. एस. डिगिकर तसेच सहायक अभियंता श्रेणी २ एस. एस. सुसुदंद्रे यांनी दिली.
सद्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पावसाने धरण ५० टक्क्यांहून अधिक भरले आहे. यामुळे धरण भरण्याच्या आशा पल्लवीत आल्या असून पाण्याची चिंता मिटणार आहे. यामुळे नागरिकांसह शेतकरी बांधवांनी काहीसे समाधान व्यक्त केले आहे. असा पाऊस बरसत राहिल्यास पुढील आठवड्यात धरण भरण्याची चिन्हे आहेत.
जलसाठ्यात येणाऱ्या कमी-जास्त विसर्गानुसार अतिरिक्त पाणी कालव्याद्वारे काही दिवसांमध्ये सोडणे शक्य होणार आहे. तसेच नदीतुन देखील प्रवाह सोडण्यात येणार आहे. धरण लवकरच पुर्ण क्षमतेने भरणार असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी नदी पात्रात काही साधन साहित्य अथवा गोठ्यात जनावरे असल्यास ती हलवावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतिने करण्यात येत आहे.
खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात विशेषतः भीमाशंकर अभयारण्य परिसरात पावसाची दमदार बँटिंग सुरू असल्याने १.५० टीएमसी क्षमता असलेले कळमोडी धरण दि. १६ जुलै रोजी १०० टक्के भरले असून धरणातील संपूर्ण पाणी आरळा नदीद्वारे चासकमान धरणाला मिळत असल्याने धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.
कळमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १ जूनपासून ५६२ मिलिमिटर तर मागील २४ तासांत २६ मिलिमिटर पावसाची नोंद करण्यात आली असून धरणाच्या ८ स्वयंचलित दरवाजे २८ सेंटीमीटर उघडले असून १ हजार ३४ क्युसेक वेगाने आरळा नदीद्वारे चासकमान धरणात जात आहे.
चासकमान धरणासह भीमाशंकर अभयारण्य परिसरातील संततधारेने भीमा नदी दुथडी भरून वाहत असून नदीद्वारे चासकमान धरणात मागील २४ तासात सरासरी ४ हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक होत आहे. चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी-जास्त होत असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यावर बाबाजी कडलग, ज्ञानेश्वर हुले, ज्ञानेश्वर कदम, सुधाकर तनपुरे, बाळासाहेब आनंदकर, रामदास तणपुरे, बाबाजी शिंदे, रोहिदास तनपुरे, सुरेश तळेकर आदी कर्मचारी रात्रं-दिवस लक्ष ठेऊन आहेत.
चासकमान धरणाची सध्यस्थिती
पाणी पातळी ६४२.५२ मीटर
एकूण साठा १३५.५४ दशलक्ष घनमीटर
उपयुक्त साठा १०८.३५ दशलक्ष घनमीटर
चासकमान धरणात मागील वर्षी याच तारखेला म्हणजे दि. २२ जुलै २०२२ रोजी ९७.४१ टक्के पाणीसाठा होता. मागील वर्षीच्या तुलनेने या वर्षी चासकमान धरणात ४७ टक्के पाणीसाठा कमी आहे.
हे ही वाचा