माउलींच्या पालखीचे आज प्रस्थान; दुपारी चारला पार पडणार सोहळा | पुढारी

माउलींच्या पालखीचे आज प्रस्थान; दुपारी चारला पार पडणार सोहळा

आळंदी : श्रीकांत बोरावके

भेटीलागी जीवा लागलीसे आस ।पाहे रात्री दिवस वाट तुझी ॥1॥
पूर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन ।
तैसें माझें मन वाट पाहें ॥2॥

पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी कैवल्याचा पुतळा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याचे ज्येष्ठ वद्य अष्टमीला मंगळवारी (दि. 21) दुपारी चार वाजता प्रस्थान होणार आहे. हा सोहळा याचि देही याचि डोळा अनुभवण्यासाठी लाखो वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत. गेली दोन वर्षे पायी वारी झाली नसल्याने यंदा पायी वारीसाठी भाविकांचा ओढादेखील अधिक असल्याचे दिसून येत आहे. देवस्थान, पालिका आणि पोलिस प्रशासन सोहळ्यासाठी सज्ज झाले असून, मंदिरात पुष्पसजावटीची लगबग सुरू आहे.

मंदिराच्या प्रवेशद्वारावर धातूशोधक यंत्रणा बसविण्यात आली असून, पासधारक व्यक्तींनाच मंदिरात प्रवेश देण्यात येत आहे. प्रस्थान दिवशी पहाटे चार ते साडेपाच घंटानाद, काकड आरती व पवमान अभिषेक होईल. सकाळी नऊ ते अकरा वीणामंडपात कीर्तन होईल. दुपारी बारा ते साडेबारा मंदिर गाभारा स्वच्छ करण्यात येईल व समाधीस पाणी घालण्यात येईल व श्रींना महानैवेद्य, दुपारी चार वाजता प्रस्थान कार्यक्रमास सुरुवात होईल. श्रीगुरू हैबतबाबा यांच्यातर्फे श्रींची आरती, संस्थानतर्फे श्रींची आरती करण्यात येईल.

त्यानंतर प्रमुख मानकर्‍यांना नारळप्रसाद वाटप, वीणामंडपात श्रींच्या चलपादुका आणल्या जातील, संस्थानतर्फे मानकर्‍यांना मानाची पागोटी वाटप करण्यात येतील. श्रीगुरू हैबतबाबातर्फे प्रतिनिधी, दिंडीप्रमुख, प्रतिष्ठित मानकरी यांना नारळप्रसाद वाटप करण्यात येईल. पादुकांचे वीणामंडपातून प्रस्थान व मंदिर प्रदक्षिणा करून दर्शन मंडप हॉल, गांधीवाडा येथे त्या विराजमान करण्यात येतील. समाजारती, रात्री अकरा ते पहाटे साडेचार जागराचा कार्यक्रम होईल. बुधवारी (दि. 22) सकाळी पादुका पुण्याकडे मार्गस्थ होतील.

हेही वाचा

महाविकास आघाडी सरकारला धोका नाही : नाना पटोले

खटाव : नेरचे पाणी सोडले; विधातेंचे आंदोलन मागे

लातूर जिल्ह्यात जोरदार पाऊस; शेतकर्‍यांत नवचैतन्य संचारले

 

 

Back to top button