पुणे, पुढारी वृत्तसेवा: 'केवळ गाणे आपल्या योग्यतेचे आहे की नाही यावर त्याची योग्यता ठरविली जाते. गायकाच्या स्वरप्रवाहात, कालप्रवाहात सामील होण्यासाठी रसिकांना सक्षम करण्याचे काम संगीतकाराने करायला हवे. ते एक सामाजिक योगदान आहे,' असे मत ज्येष्ठ गायक पंडित सत्यशील देशपांडे यांनी व्यक्त केले.
'साहित्यदीप प्रतिष्ठान'च्या वतीने देण्यात येणारा 'कलादीप पुरस्कार' संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल संगीतकार कौशल इनामदार यांना पं. देशपांडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. प्रतिष्ठानच्या अध्यक्षा ज्योत्स्ना चांदगुडे आणि कार्याध्यक्ष धनंजय तडवळकर उपस्थित होते.
चांदगुडे यांनी इनामदार यांची मुलाखत घेतली. पं. देशपांडे म्हणाले, 'कौशल हा त्याच्या पिढीतला चिंतनशील व्यक्ती आहे. ज्या कवितांना तो चाली देतो, त्या कवितांचे तो उत्तम विश्लेषण करतो. कवितेच्या शब्दांमधला एक कार्यकारण भाव तपासावा, असे त्याला नेहमी वाटते.'
इनामदार म्हणाले, 'अलीकडे सगळ्यांकडेच वेळ फार कमी आहे. त्यामुळे शास्त्रीय संगींतावर आधारित धीम्या चालीची गाणी श्रोत्यांना नको असतात.' चंचल काळे यांनी सूत्रसंचालन केले.
हेही वाचा