पुणे, पुढारी वृत्तसेवा: 'बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क' अधिकार अधिनियमाच्या अनुषंगाने शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे,' अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे स्वागत करताना शाळा परिसरातील 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्याची खात्री करावी.
शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रवेश द्यावा. यासाठी नजीकच्या दगडखाणी, वीटभट्टी, बाजारपेठा, पदपथ, कामगारवस्त्या अशा ठिकाणी सर्वेक्षण करावे, अशा सूचना शिक्षण विभागाला देण्यात आल्या आहेत. 'समग्र शिक्षा 2'अंतर्गत शाळाबाह्य बालकांसाठी विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे.
यासाठी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी 'विद्यार्थिमित्र' या पूरक शैक्षणिक साहित्याची निर्मिती करण्यात आली असून, वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेशित विद्यार्थ्यांना अध्यापन करणार्या शिक्षकांसाठी 'शिक्षक मार्गदर्शिका' या पूरक शैक्षणिक साहित्याची निर्मिती करण्यात आली आहे. शाळाबाह्य मुलांचा शोध व त्यांना मुख्य प्रवाहात दाखल करण्यासाठी बालरक्षकांना प्रशिक्षित करण्यात येणार असल्याचेही प्रा. गायकवाड यांनी सांगितले.
विद्या प्राधिकरणाच्या सर्वेक्षणानुसार मागील वर्षी राज्यात कधीच शाळेत न गेलेल्या 6 ते 14 वयोगटातील बालकांची संख्या 7 हजार 806 होती. ज्यामध्ये 4 हजार 76 मुले आणि 3 हजार 730 मुलींचा समावेश होता. तर, अनियमित उपस्थितीमुळे शाळाबाह्य झालेल्या बालकांची संख्या 17 हजार 397 होती. यामध्ये 9 हजार 8 मुले, तर 8 हजार 389 इतक्या मुली आहेत. दोन्ही मिळून ही संख्या 25 हजार 204 इतकी आहे. यापैकी विशेष गरजाधिष्ठित असलेल्या बालकांची संख्या 1 हजार 212, बालकामगार म्हणून काम करीत असलेल्या बालकांची संख्या 288, तर अन्य कारणांमुळे शाळाबाह्य होणार्या बालकांची संख्या 23 हजार 704 आहे.
हेही वाचा