

यवत : पुढारी वृत्तसेवा
यवत ग्रामपंचायतीच्या नव्या पेयजल योजनेसाठी सुमारे 30 कोटी (29 कोटी 83 लाख 36 हजार) रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामुळे यवत ग्रामस्थांना भेडसावत असलेली शुद्ध पाण्याची समस्या लवकरच मिटणार आहे.
यवत ग्रामपंचायतीसाठी शुद्ध पेयजल मिळावे, यासाठी मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. सन 2015 मध्ये यासाठी पाहणी झाली. तत्कालीन सरपंच रझिया तांबोळी यांच्या कार्यकालात सन 2019 मध्ये या प्रकल्पासाठी सुमारे 16 कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली होती. मात्र, त्यानंतर आलेली कोविडची समस्या, बांधकाम साहित्य व मजुरीचे वाढलेले दर, यामुळे आलेल्या तांत्रिक व आर्थिक अडचणींमुळे या कामाची निविदा घेण्यास कोणी धजावले नाही.
योजनेचा वाढलेला खर्च लक्षात घेऊन वाढीव निधीची प्रशासकीय मान्यता नव्याने घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. ग्रामपंचायत प्रशासन व आमदार राहुल कुल यांनी यासाठी जोरदार पाठपुरावा सुरू ठेवला. त्यास यश आल्याने हे काम लवकरच मार्गी लागेल, असे सरपंच समीर दोरगे यांनी सांगितले.
यवत गावापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या माटोबा तलावात जॅकवेल खोदून त्या ठिकाणाहून पाणी उचलले जाणार आहे. हे पाणी शुद्ध करण्यासाठी यवत गावठाण हद्दीत शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. सध्याचे गावठाण व आसपासच्या सर्व वाड्या-वस्त्यांसाठी स्वतंत्र जलकुंभांची उभारणी केली जाणार आहे. प्रत्येक घराला नळाद्वारे शुद्ध पाणी पोहचेल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.