पुणे : पुढारी वृत्तसेवा
आता म्हाडाचे घरही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. अत्यल्प उत्पन्न मर्यादेसह इतरही उत्पन्न मर्यादेत दुप्पट वाढ करण्यात आली असल्याने म्हाडाच्या घरांवर आता श्रीमंतांचीच पोळी भाजली जाणार आहे.
शहरात घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे घर घेण्यासाठी अनेक जण आपल्या आयुष्याची कमाई लावतात. सर्वसामान्याला घर घेण्यासाठी काहीसा आर्थिक दिलासा मिळावा, यासाठी म्हाडासारख्या संस्था आहेत. मात्र, आता पुण्यात घर घेणे आणखी कठीण आणि खर्चिक झाले आहे. कारण याच म्हाडाने आता घर खरेदीसाठीची अत्यल्प मर्यादा वाढवली आहे; तसेच इतर बरेच निकषही बदलले आहेत. म्हाडाच्या घरासाठी मोठी सोडत निघणार आहे. मात्र, या वेळी घर घेताना घाम निघणार आहे. एवढे मात्र या नव्या आकडेवारीतून स्पष्ट जाणवत आहे.
ज्यांनी जुन्या उत्पन्न मर्यादेनुसार तयारी केली, त्यांचे घर घेण्याचे स्पप्न क्षणात भंग होऊ शकते. त्यामुळे आता सर्वसामान्यांकडून या नव्या निर्णयाला विरोध होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही वाढवलेली उत्पन्न मर्यादा पाहता म्हाडाची घरे आता फक्त श्रीमंतांसाठी आहेत का? असा सवालही आता सर्वसामान्य नागरिकांकडून विचारण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात या निर्णयात काही बदल होणार की याच निकषानुसार घर घ्यावे लागणार, असा प्रश्न आहे.
गृहनिर्माण विभागाने यासंबंधीचा शासन निर्णय जारी केला आहे. या उत्पन्न गटासाठी विशिष्ट उत्पन्न मर्यादाही निश्चित करण्यात आली आहे. या उत्पन्न मर्यादेनुसार इच्छुकांना सोडतीत अर्ज भरत हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करता येते. उत्पन्न मर्यादेनुसारच अर्ज भरणे अत्यंत आवश्यक आहे.
– नितीन माने पाटील, सीईओ, म्हाडा, पुणे विभाग.