

इंदोरी : पुढारी वृत्तसेवा : मावळ तालुक्यात पुढील महिन्यात होणार्या पेरणीसाठी सोयाबीन बियाणाची पेरणीपूर्व उगवण क्षमता तपासणे गरजेचे आहे. शेतकर्यांनी घरच्या घरी उगवण क्षमता तपासून घ्यावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी केले आहे.
खरीप हंगाम 2022-23 मध्ये शेतकर्यांनी स्वतःकडील सोयाबीन बियाण्याची पेरणीपूर्वी उगवण क्षमतेची चाचणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे पेरणी करतेवेळी बियाण्याचे प्रमाण किती ठेवावे याबाबत अंदाज येऊ शकतो.
शेतकर्यांनी घरच्या घरीच उगवण क्षमतेची चाचणी करावी व चाचणीपूर्वी काळजी घ्यावी. शेतकर्यांनी स्वत:कडे असलेल्या सोयाबीन बियाण्याची चाळणी करून त्यामधील काडीकचरा, खडे, लहान व खुरटलेले बियाणे वेगळे करावे. चाळणीनंतर स्वच्छ झालेले समान आकाराचे बियाणे उगवण क्षमता चाचणीसाठी निवडावे.
अशी आहे उगवण क्षमता तपासण्याची प्रक्रिया एक गोणपाट घेऊन पाण्याने ओले करावे. 100 बिया घेऊन त्या एका रांगेत समान अंतर सोडून 10 बाय 10 च्या 10 रांगा तयार करा. अशा रीतीने गोणपाटेची गुंडाळी करावी नंतर या चार दिवस पाण्याचा शिडकावा मारत राहा.
चार दिवसानंतर त्या हळूहळू उघडून पाहून त्यामध्ये बीजांकृत झालेल्या बिया मोजाव्यात. जर ती संख्या 60 असेल तर उगवण क्षमता 60 टक्के आहे, असे समजावे. जर ती संख्या 80 असेल तर उगवणक्षमता 80 टक्के आहे असे समजावे. अशा पद्धतीने घरच्या घरी उगवण क्षमतेचा अंदाज घेता येतो.
सोयाबीन बियाण्याची उगवणक्षमता चांगली म्हणजे 70 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर शिफारस केलेल्या मात्रेनुसार पेरणीसाठी प्रति हेक्टरी 75 किलो बियाणे वापरावे. शेतकर्यांनी स्वतः कडील बियाणे वापरण्यापूर्वी त्याची उगवण क्षमता घरच्या घरी तपासून नंतरच अशा बियाण्यांची पेरणी करावी.
सोयाबीन बियाण्याला पेरणी अगोदर रासायनिक, जैविक नंतर बुरशीनाशक या प्रमाणात बीजप्रक्रिया करुनच पेरणी करावी. सोयाबिनला कार्बेन्डाझीयम , रायझोबियम , पीएसबी, ट्रायकोडर्मा आदींची बीज प्रक्रिया करावी.
गेल्या वर्षी सोयाबीन बियाणे उगवण क्षमतेसंबधी अडचणी निर्माण झाल्या होत्या. यामुळे यावर्षी कृषी विभागाकडून गावागावात बियाणे उगवण क्षमता व बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक घेतले जात आहे.
– प्रियंका पाटील,कृषी सहायक, नवलाख उबंरे