

वडगाव मावळ : पुढारी वृत्तसेवा : तळेगाव एमआयडीसी टप्पा क्रमांक चारमधील निगडे, कल्हाट व पवळेवाडी या गावांचे 32 (1) तात्काळ करावे,शेतकर्यांना आजपर्यंतच्या तारखेपर्यंत वाढीव मोबदला म्हणून बँकेच्या व्याजदराने व्याज देण्यात यावे व
आंबळे गावातील शेतकर्यांचे पैसे वाटप न केल्यास शुक्रवारी (दि. 25) वाकडेवाडी येथील एमआयडीसीच्या कार्यालयास टाळे ठोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी बचाव कृती समितीच्यावतीने देण्यात आला आहे.
याबाबत समितीचे अध्यक्ष माजी उपसभापती शांताराम कदम, रामदास चव्हाण, तानाजी येवले, गणेश कल्हाटकर यांनी संबंधित अधिकार्यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे, की शासनाने तळेगाव औद्योगिक टप्पा क्रमांक 4 या ठिकाणी 12 मे 2017 रोजी एमआयडीसीबाबत आदेश जारी केल्यानंतर स्थानिक शेतकर्यांनी एमआयडीसीला विरोध केला.
परंतु, स्थानिक शेतकर्यांच्या जमिनी वगळण्यात येतील, असे आश्वासन दिले. तसेच, गावच्या विकासाबाबत, रोजगार, शिक्षणाच्या सोयी, स्थानिकांना विकासाची कामे देणे, पर्यावरणाचा र्हास होणार नाही, असे प्रकल्प आणणे याबाबत सकारात्मक भूमिका घेतली.
त्यामुळे शेतकर्यांच्या जमिनी वाचवून एमआयडीसी होण्याबाबत समन्वयाची भूमिका घेतली.शासनाने सन 2018 मध्ये एमआयडीसीसाठी एकरी 73 लाख रुपये दरही निश्चित केला.
परंतु, त्यानंतरची प्रक्रिया संथगतीने सुरू असल्यामुळे गुंतवणुकदार, एजंट यांच्यामार्फत जाणीवपूर्वक सदर गावातील शेतजमीन क्षेत्रात कायद्याचा आधार घेवून अडथळा निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यामुळे चारही गावांतील शेतकरी हे हवालदिल असून कौटुंबिक कलह निर्माण झाले आहेत.
त्यामुळे यासंदर्भात तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी माजी राज्यमंत्री संजय भेगडे यांच्या उपस्थितीत कृती समितीचे पदाधिकारी व एमआयडीसीच्या अधिकार्यांच्या दूरचित्र प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीमध्ये करण्यात आली होती.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुभेदार यांनी 15 जानेवारी 2021 पर्यंत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, प्रत्यक्षात मात्र कुठलीही कार्यवाही झालेली नाही.त्यामुळे समितीच्यावतीने पुन्हा याबाबत त्वरित कार्यवाही करावी अन्यथा 25 मार्च ला एमआयडीसीच्या वाकडेवाडी येथील कार्यालयास टाळे ठोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.