पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पवना धरणातून पवना नदीत 1,400 क्युसेक आणि मुळशी धरणातून मुळा नदीत 1,000 क्युसेक इतका नियंत्रित विसर्ग गुरुवारी (दि.3) करण्यात आला. त्यामुळे शहरातून वाहणार्या पवना व मुळा नदीचे पात्र फुगून वेगाने पाणी वाहत होते; मात्र नदीपात्र धोकादायक स्थितीत नव्हते. पवना धरण गुरुवारी सकाळी सहापर्यंत 92.27 टक्के भरले. धरण क्षेत्रात होणारा पावसाचा अंदाज घेऊन पाटबंधारे विभागाने वीजनिर्मिती सांडव्यातून गुरुवारी सकाळी 11 पासून 1,400 क्युसेक नियंत्रित विसर्ग सुरू केला. तो विसर्ग रात्री दहापर्यंत कायम होता. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला होता. धरण क्षेत्रात सकाळी 8 ते सायंकाळपर्यंत 25 मिलिमीटर पाऊस झाला. सध्या धरणात 92.27 टक्के पाणीसाठा आहे.
धरणातून विसर्ग केल्यानंतर चार तासांनंतर ते पाणी पिंपरी-चिंचवड शहरात येते. दुपारी दीड ते दोनच्या सुमारास नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी वाढले. सांगवडे ते सांगवीपर्यंत दोन्ही बाजूने पात्र फुगले. वेगाने पाणी वाहत होते. मात्र, नदीचे पात्र धोकादायक स्थितीत नव्हते. त्यामुळे शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली नाही. तसेच, मुळशी धरणातून 1,000 क्सुसेक विसर्ग करण्यात आला. तेथे 11 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. विसर्ग केल्याने वाकड ते बोपखेलपर्यंतचे नदीपात्र फुगले होते. दरम्यान, धरणातून विसर्ग केला जाणार असल्याने शहरात महापालिकेच्या आपत्कालीन विभागाचे पथक सज्ज होते.
…तर शहराला पुराचा धोका
पवना धरणातून 8,000 ते 10,000 क्सुसेक विसर्ग सुरू झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरात पूरपरिस्थिती निर्माण होते. तर, मुळशी धरणातून 20,000 ते 25,000 क्सुसेक विसर्ग झाल्यास पूरस्थिती निर्माण होते. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना धोका निर्माण होतो; मात्र गुरुवारी सुरू असलेल्या विसर्गामुळे पवना व मुळा नदीकाठच्या भागाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता, असे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांनी सांगितले.
हेही वाचा :