

पळसदेव : प्रवीण नगरे: उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील नदी-ओढ्यांमधून प्लास्टिक कागद, कॅरीबॅग व प्लास्टिकच्या इतर वस्तू पावसाळ्यात पावसाबरोबर मोठ्या प्रमाणात वाहत येऊन धरणात साठतात. अनेकदा मासे व इतर जलचर त्यांचे अन्न खाण्याच्या ओघात ते गिळंकृत करीत असल्याने जलचरांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.
उजनी धरणातील वाढते पाणी प्रदूषण चिंतेचा विषय बनले आहे. धरणातील पाण्यावर मातब्बर राज्यकर्त्यांनी अनेक कारखाने, साखर कारखाने, केमिकलयुक्त कंपन्या व इतर छोटे-मोठे उद्योग आणून बसवले आहेत. संबंधित कंपन्यांमधून निघणारे प्रदूषित पाणी मोठ्या टाकीत साठवून ठेवून, पावसाच्या दिवसात नजीकच्या ओढ्या नाल्यांना सोडून दिले जाते. ते प्रदूषित पाणी नंतर उजनीत मिसळून प्रदूषण वाढते. त्यातच आता प्लास्टिक कागद, प्लास्टिक पिशव्या, बिसलेरीच्या बाटल्या व प्लास्टिकपासून बनवलेल्या विविध वस्तू नदीपात्रातून सर्वत्र विखुरलेल्या आहेत.
राज्य सरकारने प्लास्टिकला बंदी घातलेली असली तरी आज सर्व स्तरावर प्लास्टिकचा वापर सर्रास केला जात आहे. बहुतांश प्लास्टिकच्या पिशव्या उघड्यावरच टाकून दिल्या जातात. ग्रामपंचायत व नगरपालिकेच्या माध्यमातून हा सर्व कचरा उचलून नजीकच्या ओढ्या नाल्यांलगत टाकून दिला जात आहे. ओढ्यालगतचा सर्व प्लास्टिक कचरा हा पावसाळ्यात पाण्याबरोबर वाहत येऊन उजनी धरणात साठतो. पाण्यातील प्लास्टिक कुजत अथवा नष्टही होत नाही. अनेकदा मासे व जलचर प्राणी भक्ष गिळंकृत करण्याच्या ओघात प्लास्टिकचे तुकडेही गिळतात. परिणामी त्यांच्या जिवाला धोका होतो.