

वाडा : मच्छिंद्र आगिवले
वाडा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण विकसित झाले मात्र याचा फायदा स्थानिक लोकांपेक्षा बाहेरील कामगारांना जास्त झाल्याचे बघायला मिळते. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीही फारशी किफायतशीर नसल्याने महिला रोजगारापासून वंचित असल्याचे बघायला मिळत होते.
बचत गटांच्या माध्यमातून मात्र विविध प्रकारच्या वस्तू व खाद्यपदार्थ व्यवसायात सध्या महिला अग्रेसर असून वाडा शहरात भाकरी ,चपाती व पट्टी समोसे बनवण्याचा व्यवसाय अनेक महिलांना रोजगार देत आहे.
तांदुळाची भाकरी हा वाडा तालुक्यातील लोकांच्या जेवणाचा प्रमुख घटक असून हॉटेल व खाणावळ व्यवसायात भाकरीला मोठी मागणी आहे. वाडा शहरातील काही महिला घरगुती पद्धतीने भाकरी बनविण्याचा व्यवसाय करतात जो सध्या तेजीत आहे.
भाकरीला १० रुपये तर चपाती ६ रुपयांत मिळत असून दिवसाला जवळपास २ हजार भाकरी वाडा शहरातून विकल्या जातात. पट्टी समोसे बनविण्याचा व्यवसाय अशाच पद्धतीने तेजीत असून जवळपास ४ ते ५ हजार समोसे दररोज विकले जातात.
घरगुती, चविष्ट व स्वच्छ पद्धतीने हे व्यवसाय चालविले जात असल्याने ग्राहकांच्या मोठ्या पसंतीस उतरत आहेत. दोन्ही व्यवसायात महिला कामगारांची मोठी गरज असून अनेक महिलांसाठी घराच्या नजिकच रोजगार उभा राहतो.
शहरासह तालुक्यातील नाक्यांवर नाश्ता बनविणाऱ्या दुकानात कच्चे समोसे विकले जातात जे दोन जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. तांदुळाच्या भाकरी तितक्याच प्रसिद्ध असून पावसाळ्यात स्थानिक धबधबे भटकंती, पार्ट्या व पर्यटन वाढले की भाकरींची मागणी देखील तितकीच वाढते असे काही व्यवसायिक महिलांचे म्हणणे आहे.