

खानिवडे : आपल्या हंगामात जवळपास अडीच महिने चांगलाच गारठा देणाऱ्या थंडीनंतर वसईत ऊन वाढायला सुरवात झाली आहे . ऊन वाढल्याबरोबर वसईच्या रान पट्टीत वणव्यांना सुरवात झाली आहे. याचा फटका मात्र सर्वप्रथम वन्यजीवांना बसत असून वसईच्या डोंगरांना वणवे भडकवणाऱ्यांनी आगी लावण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. वसईत यंदा पावसाळ्यानंतर वणव्याना सुरुवात झाली आहे. असे म्हणण्यापेक्षा काहीजणांकडून जाणीवपुर्वक वणवे पेटवायला सुरवात करण्यात आली आहे .मागील काही दिवसांपासून वसई पूर्वेतील जीवदानी गड, कुंभारपाडा धरणाचा डोंगर,
टकमक खालील मडकेपाडा , कामण या भागातील जंगलातून रात्री आगीच्या ज्वाळा तर दिवसा नभात पसरणाऱ्या धुराचे लोट दिसून येत आहेत .यामुळे पून्हा एकवार दरसाल प्रमाणे वन्यजीवांचा अधिवास धोक्यात आला आहे. याबाबत वनविभागाच्या रडावर वणवे भडकवणारे वन विभागाच्या रडावर आले आहेत. त्यांचा तपास सुद्धा करण्यात येत आहे. मात्र वनक्षेत्रामुळे आणि आवाहन करूनही तेथील खबऱ्यांकडून असामाजिक तत्वांनी वणवे भडकवणाऱ्यांची माहिती मिळत नसल्याने ते वनविभागाच्या हाताबाहेर च आहेत. तर लागणाऱ्या वणव्यांमुळे भकास उजाड वाटणाऱ्या जंगलातून वन्यप्राणी मानवी वस्त्यांमध्ये घुसखोरी करू लागले आहेत असे जाणकार सांगत आहेत.
पालघर जिल्ह्यातील डोंगरांना दरसाल उन्हाळा सुरू झाला की आगी लागतात पूर्वी हे वणवे येथे असलेल्या घनदाट जंगलात विस्तीर्ण झाडांच्या फांद्या एकमेकांना घासून झालेल्या घर्षणाने ठिणग्या तयार होऊन जमिनीवर जमा झालेल्या सुक्या पाला पाचोळा , गवत ,यांच्यावर पडून आगी लागत होत्या असे सांगितले जाते .मात्र मागील काळात झालेल्या झाडांच्या बेसुमार कत्तलीने येथील वनसंपदा पन्नास टक्क्यांहून अधिक कमी झाली आहे .त्यामुळे घर्षणाने आग लागण्याचा प्रकारच हद्दपार झाला आहे .आता मात्र जी काही जंगले वाचली आहे तेथील जंगलात आगी लागत नसून लावल्या जात आहेत .
या आगी लावण्याच्या कारणांमध्ये डोंगराळ भागातून जाणाऱ्या मार्गावरून चालणारे काही वाहनचालक ज्यांना धूम्रपान करण्याची सवय आहे. ते विडी किंवा सिगरेट न विझवता चालत्या वाहनातून रस्त्याच्या कडेला भिरकावून टाकतात .ज्याचा परिणाम कडेचे सुकलेले गवत पेट घेऊन त्याचे रूपांतर वणव्यात होते .त्याच बरोबर वन संपदेवर जीवन अवलंबून असणारे हे सुद्धा रानात फिरताना त्यातील काहींना असलेल्या सवयीतील विडी सिगरेट न विझवता भिरकावून देतात , त्यामुळे वणवे लागतात .