

खानिवडे : वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आय प्रभाग समिती मधील वसई कोर्ट नजीक विविध व्यावसायिक, टपऱ्यांवर गुरुवारी अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली.
मागील काही दिवसांपासून विविध प्रभागांमध्ये हातगाड्या, टपऱ्या, खाद्य विक्रेते यांच्यावर कारवाई सुरू आहे. मुख्य रस्त्या नजीक अशा अनेक व्यावसायिकांवर कारवाई सुरू झाल्यामुळे महानगरपालिकेच्या विरोधात छोट्या व्यावसायिकांमध्ये रोष आहे.
पालिका प्रशासन मोठ्या बेकायदा इमारतींवर कारवाई न करता आपल्यावर कारवाई करत असल्यामुळे गुरुवारच्या कारवाईत या व्यवसायिकांच्या रोषाला पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागले.
याठिकाणी खाजगी इसमांचे व्यवसाय याठिकाणी असल्यामुळे त्यांच्यावर कारवाईसाठी मागणी जोर धरू लागली होती.याबरोबरच काही राजकीय पक्षांनी येथील जागा अडवून ठेवल्या होत्या. त्यांचे तंबू पालिका प्रशासनाने उखडले. या कारवाईनंतर हातगाडी व टपरीधारकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
नवी खाऊगल्ली वादात
पालिकेच्या अतिक्रमण विभागाने येथील संस्कृती इमारती समोर सर्वे क्रमांक 40 ई या महाराष्ट्र शासनाच्या जागेवर खाऊ गल्ली वसवलेली आहे. येथील पदपथावर उभारलेल्या टपऱ्या हटवण्यात आले असल्या तरी महसूल विभागाच्या जागेवर पालिकेने अतिक्रमण केल्याचे दिसून येते त्यामुळे महसूल विभागाने याकरिता पालिका प्रशासनाला पत्र दिले होते परंतु पालिकेने सदरचे अतिक्रमण हटवलेले नाही. त्यामुळे या अतिक्रमणावर कारवाईची मागणी केली जात आहे.