

मुरबाड : शहरांची तहान भागवण्यासाठी काळु धरण बांधण्याचा जसा शासन स्तरावर घाट घातला जात आहे. तसाच या धरणाला स्थानिकांचा प्रखर विरोध होताना दिसत आहे. या पूर्वी झालेल्या अंदोलनाचे नेतृत्व पुरुष करत असत. परंतू आता हा लढा महीलांनी हातात घेतल्याचे दिसून येत आहे.
याची सुरुवात 8 मार्च या जागतिक महिला दिन तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून चासोळे येथील हाटकेश्वर मंदिरात अंदोलनाचा चेहरा असलेल्या इंदवीताई तुळपुले यांच्या नेतृत्वात घेण्यात आला.
या मेळाव्याचे आयोजन अरुण राऊत, नंदकुमार राऊत, भरत राऊत, विलास राऊत, विनोद राऊत, शकील शेख, जयवंत थोरात,अनंता राऊत, शिवाजी घोलप, किसन आलम, जगदीश निमसे, बापू देशमुख, यशवंत माधवी, नेताजी ठाकरे, पंढरीनाथ दळवी, मोढवे, अनिल कवटे, गणेश भला, चिंतामण शेंडे, तसेच चासोळे, आंबिवली, शिरसोनवाडी, भट्टीची वाडी, तळेगाव, खरशेत, उमरोली, दिघेफळ, खुटल, वाकळवाडी, केव्हारवाडी, बांगरवाडी, पेजवाडी, करपटवाडी, आवळ्याचीवाडी, भोरांडे, डोंगरवाडी, आदी गावांच्या महिलांचा समावेश होता.
मुरबाड तालुक्यात काळु नदीवर धरण बांधण्यात येणार असून या पाण्याचा वापर मुंबई, ठाणे, या शहरांना होणार आहे. या शहरांत रोजगारासाठी काही वर्षापूर्वी आलेले राज्यभरातील नागरिकासह परप्रांतीयांचे आलेले लोंढे येथेच स्थायिक झाले. शहरांची लोकसंख्या वाढली परंतु त्यांना सोईसुविधा देण्यात शासन अपयशी ठरत आहे. मुख्यतः येथील पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे या शहरांची तहान भागवण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, अंबरनाथ या शहरांचा बळी दिला जात आहे.
धरण बांधून शासन मोकळे होईल, पण विस्तापीतांच काय?
शहरांना पाणी देण्यासाठी तानसा, भातसा, वैतरणा ही धरण बांधण्यात आली. परंतू बाधीत झालेल्या नागरिकांचा प्रश्न आज पर्यंत सुटलेला नाही. तसेच काळु धरण बांधून शासन मोकळे होईल, पण विस्तापीतांच काय? पुढचं आयुष्य संघर्षात घालवण्यापेक्षा पुढच्या पिढीसाठी आताच संघर्ष करुन धरण होऊच द्यायच नाही. असा पवित्रा येथील पुरुषांनी घेतलेला असताना त्यांच्याही पुढे चार पावले टाकत हा लढा येथील महीलांनी हातात घेण्याचा निर्णय घेतला आहे.
याची सुरुवात जागतिक महिला दिन आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून दिनांक 10 मार्च रोजी चासोळे येथील जागृत देवस्थान असलेल्या हटकेश्वर मठात इंदवीताई तुळपुले यांच्या उपस्थितीत मेळावा घेऊन संघर्षात रणशिंग फुंकले आहेत. या मेळाव्यास महीला मुली वृध्द महीलांची उपस्थिती लक्षणीय होती. या वेळी उपस्थित महिलांनी छातीची ढाल करून हा लढा रस्त्यावर उतरून लढण्याचा निर्धार केला आहे. या मेळाव्यास इंदवीताई तुळपुले यांचेसह माजी जि.प. सदस्या नंदाताई उघडा, साधना वैराळे, डॉ. दिव्या ठाकूर यांनी मार्गदर्शन केले.