

वासिंद : शहापूर तालुका हा धरणांचा तालुका असूनही या शहापूर तालुक्यातील 424 गांव-पाड्यांना जानेवारी व फेब्रुवारीपासून पाण्याच्या तीव्र टंचाईची झळ लागत असून यासाठी पाणीटंचाई कृती आराखड्याला मंजुरी मिळाली असून या प्रस्तावित कामांसाठी 17 कोटी 29 लाख अंदाजीत खर्च अपेक्षित केला आहे.
2025-026 साठी टंचाई कृती आराखडा मंजूर करण्यात आला असून या आराखड्यात तालुक्यातील 120 गांवे व 304 पाड्यांचा समावेश आहे. यामध्ये नवीन विंधन विहीर, पुरक नळ पाणी पुरवठा योजना, नळ पाणी पुरवठा योजना विशेष दुरुस्ती व टँकरने पाणी पुरवठा करणे या विविध पाणी पुरवठा कामी योजना आखण्यात आलेल्या आहेत.
दरवर्षी ऐन उन्हाळ्यात तालुक्यातील अनेक गावपाड्यात तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. ही पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून तसेच पंचायत समिती विभागाच्या
देखरेखीखाली विविध पाणी योजना राबविल्या जात आहेत. काही गाव-पाड्यांना तीव्र पाणीटंचाई निर्माण होत असल्याने येथे टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
यंदाही या पाणीटंचाई समस्या दूर व्हावी यासाठी कृती आराखडा मंजूर करण्यात आलेला असून यामध्ये टँकरने पाणी पुरवठासाठी जानेवारी ते मार्च 25 गाव, 95 पाड्यांसाठी 72 लाख, एप्रिल ते जून 62 गांव, 156 पाड्यांसाठी 3 कोटी 27 लाख, नळ पाणी पुरवठा योजना विशेष दुरुस्ती जानेवारी ते मार्च 22 गाव, 14 पाडे यासाठी 7 कोटी 51 लाख 40 हजार, पुरक नळ पाणी पुरवठा योजना जानेवारी ते मार्च 09 गांव, 14 पाडे याकामी 5 कोटी 51 लाख 60 हजार तर नविन विंधन विहिरी हात पंप जानेवारी ते मार्च 02 गाव, 25 पाड्यांसाठी 27 लाख रुपये अशी प्रस्तावित कामे नियोजित करून यासाठी एकूण 17 कोटी 29 लाख रुपये अंदाजित खर्च अपेक्षित केलेला आहे.
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये पाणी समस्या निर्माण होत असून शहापूर तालुक्यात ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाई समस्या अधिक जाणवत असते. यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून विविध योजना राबवून पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.